Thursday 29 May 2014

तत्त्वभान २२ फिलॉसॉफीचा महाराष्ट्रातील श्रीगणेशा ९ मे २०१४

लॉर्ड मेकॉले (१८०० -१८५९)
फिलॉसॉफीचा महाराष्ट्रातील श्रीगणेशा 
श्रीनिवास हेमाडे  
        प्रबोधन ही खास युरोपीय घटना असली तरी भारताच्या संदर्भात रेनेसांस, रेफर्मेशन आणि एनलायटनमेन्ट अशा तीन चळवळी मिळून जे काही होईल त्यास प्रबोधन म्हंटले पाहिजे. रेनेसांस (सांस्कृतिक नवजीवन ), रेफर्मेशन (धर्मसुधारणा) आणि एनलायटनमेन्ट (प्रबोधन- वैचारिक व वैज्ञानिक मोहीम ) अशा तीन टप्प्यात युरोपीय प्रबोधन घडले. भारतात यातील नेमके काय घडले, ते शोधावे लागेल...

फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान या अर्थाने महाराष्ट्रात तत्त्वज्ञान या विषयाचा श्रीगणेशा एकोणिसाव्या शतकाच्या मध्यंतरी झाला. प्रबोधनाचा अटळ भाग म्हणून उपयुक्ततावादी नीतीविचार आधी विविध चळवळीत आणि नंतर शिक्षण क्षेत्रात एक विषय म्हणून तो अभ्यासक्रमात समाविष्ट झाला.

येथे एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. 'फिलॉसॉफी' हा शब्द पाश्चात्य विचारविश्वात आधी भौतिकशास्त्र (फिजिक्स) साठी वापरला जात होता. फिजिक्सचे मूळ नाव 'नॅचरल फिलॉसॉफी' असे होते. न्युटनच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव 'निसर्गविषयक तत्त्वज्ञानाची गणिती तत्त्वे' (मॅथॅमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी) असे होते. साहजिकच विसाव्या शतकाच्या दोन-तीन दशकापर्यंत भौतिकशास्त्र विभागाला डीपार्टमेन्ट ऑफ नॅचरल फिलॉसॉफी असे नाव होते. आणि प्राध्यापकांना प्रोफेसर ऑफ नॅचरल फिलॉसॉफी म्हंटले जाई. खूप उशिरा फिजिक्स आणि फिलॉसॉफी ही स्पष्ट विभागणी झाली.

महाराष्ट्रातील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारे एकमेव पुस्तक म्हणजे फादर मॅथ्यू लेदर्ले (१९२६-१९८६) फिलॉसॉफीकल ट्रेंड्स इन मॉडर्न महाराष्ट्रा. हा लेदर्ले यांचा पीएचडीचा प्रबंध आहे. दुसरे म्हणजे या विषयावरील एकमेव लेख म्हणजे डॉ.सदानंद मोरे यांचा "स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रातील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास'' (परामर्श नोव्हेंबर १९८८). हा शोधनिबंध मराठी प्रमाणे इंग्रजीत उपलब्ध आहे. मराठीतील लेख महाजालावर उपलब्ध आहे.

लेदर्ले यांच्या संशोधनानुसार अभ्यासक्रमात पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा प्रवेश झालंच, पण त्या आधी ख्रिश्चन मिशनरी मंडळींनीही नव्या विद्येचा प्रारंभ केला. ईस्ट इंडिया कंपनीला मिशनरी मंडळींच्या या उपद्व्याप बिलकुल मान्य नव्हता. ब्रिटिशांनी मिशनरी मंडळींना आमंत्रण तर दिले नव्हतेच, पण मिशनरी मंडळींचे येणे हे ब्रिटिशांना लाजिरवाणे वाटत होते. लेदर्ले यांच्या मते, भारतात आलेला विल्यम कॅरे हा पहिला ख्रिस्ती मिशनरी. तो १९७३ साली कलकत्त्यात आला. राजा राममोहन रॉय नंतर सतीप्रथेचे खरे स्वरूप यानेच लोकांना समजावून दिले. त्याने सेरामपुर येथे खास नेटिव्ह जनतेला "पौर्वात्य साहित्य आणि पाश्चात्य विज्ञान' शिकविण्यासाठी कॉलेज सुरु केले. त्यात पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा, मुख्यतः ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचा अभ्यासक्रम समाविष्ट होता. या खेरीज बायबलच्या काही भागाचे भाषांतर, मराठीचे व्याकरण, पहिला मराठी-इंग्लिश शब्दकोश कॅरेने प्रसिद्ध केला. कॅरेनंतर अनेक मिशनरी येत राहिले.

डॉ. मोरे यांच्या निबंधात तीन मुद्दे आहेत. पहिला, पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा, विशेषतः स्पेन्सर, मिल, बेंथम,ऑगस्ट कोम्ट यांचा लोकहितवादी, टिळक, न्या. रानडे,रामकृष्ण भांडारकर, तसेच प्रार्थना सामाजिस्ट, सुधारणावादी आणि आगरकर संप्रदाय या भारतीय सुधारकांवरील प्रभावाचे स्वरूप स्पष्ट करणे व, यातील निवडक विचारवंतांवर पडलेल्या प्रभावाची समीक्षा करणे आणि तिसरा मुद्दा , तत्त्वज्ञान विषयक मराठीतील त्या काळात महाराष्ट्रात आणि बडोदा येथे निर्माण झालेल्या साहित्याची नोंद घेणे. उलट्या क्रमाने जाता डॉ.मोरे यांच्या मते, मराठीतील महाराष्ट्रातील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा ओनामा म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४ - १८७८) यांनी लिहिलेले सॉक्रेटीसचे चरित्र. सॉक्रेटीसने महाराष्ट्रात बरेच मूळ धरल्याचे ते स्पष्ट करतात. सॉक्रेटीसचे आणखी काही लेखन झाले. मोरेंच्या लेखानंतर आणखी काही लेखन झाले. उदाहरणार्थ, प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांनी 'सॉक्रेटीसीय संवाद' (आजचा सुधारक सप्टेंबर व ऑक्टोबर १९९०) हे उत्कृष्ट अनुवाद सिद्ध केले आहेत.

डॉ. मोरे, यांच्या मांडणीतील कळीचा मुद्दा म्हणजे स्पेन्सर, मिल इत्यादींचा लो. टिळकांच्या 'गीतारहस्य' वरील प्रभाव. मोरेंच्या मते, गीतारहस्य'मुळे काही फायदे झाले खरे; पण तोटाही झाला. तो असा की त्याकाळी येऊ घातलेल्या पाश्चात्य तत्त्ववेत्यांच्या विचारांचे आव्हान स्वीकारून टिळकांनी 'गीतारहस्य' चे लेखन करताना तौलनिक तत्त्वज्ञानपद्धतीचा मोठ्या खुबीने उपयोग केला. पण त्यामुळे आधुनिक विद्वानांवर पाश्चात्य तत्त्वज्ञान व विज्ञानाचा जो परिणाम झाला होता, तो नाहीसा झाला. मुळात भारतीय तत्त्वज्ञानात जगातील सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आहेत, असा समज होता, तो तौलनिक तत्त्वज्ञानपद्धतीने अधिक घट्ट झाला आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची भारतीयामधील लाट ओसरली. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला मोठा आघात बसला. आजही 'गीतारहस्य' ची आणि टिळकांच्या भूमिकेची काटेकोर समीक्षा होत नाही, असे ते नमूद करतात.

महाराष्ट्रात विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यास प्रथम (१८८५) नागपूरच्या तत्कालीन मॉरीस आणि आजच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात सुरु झाला. तत्कालीन मध्यप्रांत आणि बेरार या महसूल विभागाचा कमिशनर सर जॉन हेन्री मॉरीस हा एलफिस्टन सारखाच मवाळ, उदारमतवादी होता. त्याच्या आदरार्थ तत्त्वज्ञान विभाग सुरु झाला आणि खुद्द मॉरीसने पुढाकार घेतला. त्यानंतर मुंबई विद्यापीठ, पुण्याचे जुने पूना कॉलेज (आजचे स.प. महाविद्यालय ) व फर्गुसन महाविद्यालय येथे तत्त्वज्ञान विभाग सुरु झाले.

सुज्ञ ब्रिटीश अधिकाऱ्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञान विद्यापीठीय व महाविद्यालयीन पातळीवर सुरु करण्यात घेतलेल्या पुढाकारामागे आणखी काही करणे होती. उदाहरणार्थ लॉर्ड मेकॉले (१८०० -१८५९) च्या मते 'सुशिक्षित नेटिव्ह इंडियन' म्हणजे ज्याला मिल्टनचे काव्य, जॉन लॉकचे तत्त्वज्ञान आणि न्युटनचे भौतिकशास्त्र ' यांचा परिचय आहे तो ! पुढे जाऊन ज्या भारतीयाला एकूणच ब्रिटीश तत्त्वज्ञान, विज्ञान आणि साहित्य यांची उत्तम जाण आहे तोच खरा 'सुशिक्षित नेटिव्ह इंडियन'. मेकॉलेने जॉन लॉकचे तत्त्वज्ञान निवडण्यामागे एक निश्चित कारण होते.

युरोपातील प्रबोधनकाळास 'प्रबोधन' म्हणण्याचे कारणच हे होते की लॉर्ड हर्बर्ट ऑफ चेरबरी (१५८३-१६४८) जॉन लॉक (१६३२-१७०४) तत्त्ववेत्त्यांनी मुख्यत्वे चर्चची भयावह जोखड व विविध कर्मकांडग्रस्त अंधश्रद्धा यातून युरोपीय जनतेच्या बुद्धीला मुक्ती दिली व सार्वजनिक जीवनात सहिष्णुतेला अवकाश दिला. विशेषतः लॉकने 'अॅन एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडीन्ग' या युगप्रवर्तक ग्रंथात " 'कुणालाही काहीही तत्त्वज्ञान सांगण्यापूर्वी आपल्या बुद्धीला कशाचे ज्ञान होणे आवश्यक आहे', हा विचार केला पाहिजे" या भूमिकेची मानसशास्त्रीय आणि समीक्षक बाजू मांडली.लॉकचा अनुभववाद हा नंतर विज्ञानाचा पाया ठरला.

या तत्त्वज्ञानाचा प्रभाव मेकॉलेवर असावा. ब्रिटीश तत्त्वज्ञान व विज्ञान तत्कालीन एनलायटनमेन्टच्या तत्त्वज्ञानात होते. ते सैद्धांतिक स्वरुपात 'फिलॉसॉफी' या नावाने भारतीयांना शिकविणे गरजेचे होते. म्हणून ते अॅकेडेमिक बनवले गेले. अर्थात मेकॉले जहाल होता तर एलफिस्टन मवाळ होता, असे म्हणता येते. कारण भारतीयांना जी इंग्रजीविद्या प्रदान करण्यात आली, त्यामागे इंग्रजी जाणणारा नोकरवर्ग निर्माण करणे, हा व्यावहारिक हेतू होताच; पण एक तात्त्विक पातळीवरील विचार एलफिस्टन (१७७९-१८५९) सारख्या सुज्ञ प्रशासकाच्या मनात होता. आज न उद्या हा देश सोडून जावे लागेल, त्यावेळी चांगले, बुद्धिमान प्रशासक व नेते असले पाहिजेत, अन्यथा चुकीच्या लोकांच्या हातात राज्य गेले तर येथील गरिबांचे खरे नाही, अशी भीती आणि शंका त्याला तीव्रतेने वाटत होती. त्यामुळे विशाल दृष्टीकोण आणि स्वतः निवडलेली तत्त्वे यानुसार जगणारा भारतीय माणूस घडविणे, हे एलफिस्टनला अपेक्षित होते. त्याला अपेक्षित भारतीय नागरिक व नेते आज आहेत, हे म्हणणे धाडसाचे आहे, हे उघड गुपित आहे.

Live Paper Link

Epaper Link  





No comments:

Post a Comment