Thursday 25 September 2014

तत्त्वभान ३८ व्यवसायाचे नीतिशास्त्र २५ सप्टेंबर २०१४

व्यवसायाचे नीतिशास्त्र

श्रीनिवास हेमाडे 
व्यवसाय आणि धंदा एकत्र आले की त्यांच्या मिसळणीतून नवेच प्रश्न निर्माण होतात. मालकाला धंदा हवा असतो आणि व्यावसायिक असलेल्या नोकराला अधिक वेतन हवे असते; कारण त्याला मालकाचा नफा दिसत असतो; पण नफ्याच्या प्रमाणात वेतन देण्याची मालकाची इच्छा नसते. इथे नैतिक संघर्ष आणि इतर व्यवस्थापनाचे संघर्ष निर्माण होतात.

          औद्योगिक क्रांतीनंतर युरोपीय राष्ट्रात चार गोष्टी घडल्या. उद्योग-धंद्यामुळे अनेक व्यवसायांचा आणि त्याला आधारभूत असलेल्या अनेक ज्ञानक्षेत्रांचा उदय झाला. तसेच प्रत्येक ज्ञानक्षेत्राचे विशेषीकरण झाले आणि बहुतेक सारी ज्ञानक्षेत्रे परस्परावलंबी बनली. परिणामी त्यानुसार वागण्याचे नियमही बनवावे लागले. या विशेषीकरण आणि परस्परावलंबीत्वामुळे नीतीच्या संकल्पनांचेही विशेषीकरण झाले, त्या संकल्पना परस्परावलंबी होत गेल्या. हा वेग युरोपीय राष्ट्रात जोमदार होता. त्याचा ज्ञानक्षेत्रीय परिणाम म्हणून व्यावसायिक नीतिशास्त्र उदयास आले. 
          मराठीत व्यवसाय आणि धंदा हे दोन शब्द इंग्लिशमधील Business या शब्दाचे भाषांतर या अर्थाने वापरण्याची प्रथा आहे. पण नेमका अर्थ निश्चित करावयाचा झाल्यास व्यवसाय आणि धंदा यात फरक करणे आवश्यक ठरते. त्यासाठी दोन-तीन गोष्टी कराव्या लागतात. पहिली, ज्या औद्योगिक संस्कृतीतून या संकल्पना विकसित झाल्या आहेत त्यानुसार व्यवसाय आणि धंदा यात फरक करणे. दुसरे, हे दोन शब्द केवळ फरक करता येणारे आहेत, असे वेगळे शब्द नसून त्या एकमेकांपासून वेगळ्या करता येण्याजोग्या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत, हे लक्षात घेणे. तीन, आपण मराठीत विचार करीत असल्याने त्यांचे जास्तीत जास्त अचूक भाषांतर करता येईल, असे पाहणे. ही कामे झाल्यानंतर त्यांच्या नीतीशास्त्राची रचना कशी केली जाते, त्याचा आढावा घेणे. 
          या लेखात आपण 'व्यवसाय' हे Profession चे आणि 'धंदा' हे Business चे भाषांतर या अर्थाने उपयोगात आणू. तसेच Professional म्हणजे व्यावसायिक आणि म्हणजे Business करतो तो धंदेवाईक, असे वापरू. मराठीतील या संबंधीचे तज्ञांचे लेखन मात्र 'व्यवसायाचे नीतिशास्त्र' असे उपलब्ध असून ते Professional Ethics आणि Business Ethics या दोन्हीचे भाषांतर या अर्थाने आले आहे.
        Business Ethics या नावाने जी काही इंग्लीशमधील संदर्भ पुस्तके, पाठ्यपुस्तके आणि इतर साहित्य पाहता आणि त्यांचे मराठीकरण करण्याचा प्रयत्न पाहता Profession आणि Business या दोन्ही शब्दांचे अर्थ Business अशा अर्थाचे निश्चित आणि मराठी भाषांतर 'व्यवसाय' असे केल्याचे आढळते. त्यानुसार Business Ethics अशी भाषिक रचना होते आणि तसे लेखन होते. 
          वस्तुतः एका भाषेतून दुसऱ्या भाषेत संकल्पनांचा प्रवास होताना संदर्भ बदलतो आणि साहजिकच अर्थही बदलतो. तो सर्वमान्य असतोच नाही. शिवाय भाषांतरीत भाषेत अनेक पर्यायी शब्द असतात, त्यांचे आकलन सुद्धा अनेक तऱ्हेने होत असते. ही सापेक्षता लक्षात घेतली तर अशा वादग्रस्त संकल्पनांचे भाषांतर ही 'इंद्रधनुष्यी कसरत' (rainbow exercise) ठरते. आपण केले आहे ते बरोबर आहे, असे वाटते पण स्पष्ट करता येईल, अर्थांची, त्यांच्या विविध छटांची निश्चित विभागणी दाखविता येईल, याची खात्री नसते. पण त्याचवेळी ते मोहक दिसते. नेमके हेच हा विषय मराठीत शिकविताना घडतो. विशेषतः प्रश्नपत्रिका रचताना हमखास गोंधळ होतो. 
       Profession आणि Business यात फरक काय? तो असा : ज्यात या ना त्या स्वरुपात एक अथवा अनेक व्यक्तिकडून केवळ सार्वजनिकहिताची सेवा दिली जाते किंवा अपेक्षित आहे ते Profession आणि ज्यात मालक किंवा भागधारकांना आर्थिक लाभ मिळावा, हाच एकमेव उद्देश आहे तो Business. 
     व्यावसायिक माणूस (Professional) ज्या क्षेत्रात काम करतो त्या व्यवसायानुसार त्याने कोणते नीतीनियम पाळावेत याचे निकष ठरविते ते व्यावसायिक नीतीशास्त्र. ज्याने काही कौशल्ये प्राप्त केली आहेत, त्यांचा वापर कसा करावा याचे ज्ञान त्यास आहे आणि या कौशल्ये व ज्ञानाचा वापर केवळ 'सार्वजनिक हित' या उद्दिष्टासाठी करतो; त्यांच्या आधारे करीत असलेल्या कामात तो एका निश्चित निष्कर्षाप्रत येऊ शकतो, त्यास व्यावसायिक म्हंटले जाते. हे काम सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. कारण ही कौशल्ये आणि ज्ञान त्याच्याकडे नसतात. व्यावसायिकास याचा मोबदला मिळतो पण तो निश्चित नसतो. व्यावसायिकाकडे प्रामाणिकपणा, सचोटी, पारदर्शकता, विश्वासार्हता, आत्मविश्वास, कायदापालनाची प्रवृत्ती, निष्ठा, आदर हे गुण असावेत अशी अपेक्षा असते. डॉक्टर, शिक्षक, सुतार, पत्रकार, वकील किंवा लोकप्रतिनिधी-मंत्री ही काही उदाहरणे. 
        या उलट धंद्यात कौशल्यापेक्षा निव्वळ नफा हेच उद्धिष्ट असते, नफा मिळत नसेल तर धंदा बंद करता येतो, दुसरा सुरु करता येतो. धंदेवाईक माणूस केवळ भांडवलाच्या आधारे धंदा करतो. तो तज्ञ व्यावसायिकाला नोकरीला ठेऊ शकतो, त्याच्या कौशल्याचा व ज्ञानाचा उपयोग करून तो नफा मिळवितो. नफेखोरीच्या धंद्यात नीतिनियमांचा प्रश्न येत नाही. पण व्यवसाय आणि धंदा एकत्र आले की त्यांच्या मिसळणीतून नवेच प्रश्न निर्माण होतात. मालकाला धंदा हवा असतो आणि व्यावसायिक असलेल्या नोकराला अधिक वेतन हवे असते; कारण त्याला मालकाचा नफा दिसत असतो; पण नफ्याच्या प्रमाणात वेतन देण्याची मालकाची इच्छा नसते. इथे नैतिक संघर्ष आणि इतर व्यवस्थापनाचे संघर्ष निर्माण होतात.
      वस्तुतः Business Ethics हे Professional Ethics चा उपविभाग म्हणून निर्माण झाले आहे. पण या दोन्हींचा तोंडवळा इतका सारखा आहे की त्यात फरक करणे गुंतागुंतीचे झाले. परिणामी युरोपीय-पाश्चात्य राष्ट्रात Business Ethics चाच अभ्यास प्रामुख्याने होतो आणि Professional Ethics हे अॅकेडेमिक चर्चाविश्वापुरते उरले. Business Ethics ही संज्ञा कोण कसा वापरेल, त्यावर त्याचे आकलन अवलंबून राहाते आणि त्या आकलनाचा चांगला-वाईट परिणाम एकूण नैतिक वर्तनावर होतो, असे मत रिचर्ड टी. डी. जॉर्ज या अभ्यासकाने व्यक्त केले आहे. 
      साधारणपणे Business Ethics चे विश्लेषण तीन पातळ्यांवर केले जाते. पहिली - उद्योगसमूह ज्या व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक परिसरात उभारले जातात त्यातील स्थानिक मूल्ये कोणती ते तपासणे आणि मुक्त बाजारपेठेची उचीतता लक्षात घेता व्यापक मानवी न्याय व सामाजिक कल्याण या मूल्यांशी त्या स्थानिक मुल्यांची सांगड कशी घालावी. दुसरी - खासगी उद्योगसमूहानी बनविलेल्या नीतिनियमांच्या आधारे एकूण उद्योगसमूहांचे नैतिक वर्तनाचे निकष कोणते, यांची थेट पारदर्शी तपासणी करणे; तिसरी - एखाद्या विशिष्ट व्यावसायिक संस्थेतील किंवा उद्योगसमूहातील व्यक्तींचे हक्क आणि त्यांच्या नैतिक बांधिलकीचे स्वरूप कोणते ? 
       व्यापार जितका जुना आहे तितकेच त्यासंबंधीची नैतिक नियमावली प्राचीन आहे. हम्मुराबी राजाचे  नियम (इ.स.पु. १७००), अॅरिस्टॉटलचे नियम (इ.स.पू. ३२२..), ज्यू-ख्रिश्चन परंपरेतील 'देवाच्या दहा आज्ञा' मधील नियम, कौटिल्याचे नियम (इ.स.पु. ३००) हे लोकांचे एकमेकांशी व्यावसायिक नाते कसे असावे याचे निर्देश देतात. पण अॅकेडेमिक अभ्यास विषय म्हणून याचा अभ्यास सुरु झाला तो विसाव्या शतकात. १९८७ मध्ये अमेरिकेचे सिक्युरिटीज अँड एक्सेंज कमिशनचे प्रमुख जॉन शड यांनी हार्वर्ड बिझिनेस स्कूलला जवळपास तीन मिलियन डॉलर (अंदाजे १८ अब्ज २८ कोटी) ची देणगी असा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी दिली. आज अमेरिका- युरोपात अनेक बिझिनेस स्कूल आणि तत्त्वज्ञान विभागात हा अभ्यासक्रम अगदी जोरात चालू आहे. 
       प्राचीन भारतात आपापल्या व्यवसाय, धंद्यानुसार वागणे हेच नीतीने वागणे, हा नैतिक नियम होता. व्यवसाय हा जातीचा घटक होता. परिणामी बारा बलुतेदारीचे अर्थशास्त्र मांडताना व्यवसायाचे नीतिशास्त्र मांडण्याऐवजी जातीचे नियमशास्त्र मांडण्यात आले. तिने व्यावसायिक नीतिशास्त्राची भृणहत्या केली.

Thursday 18 September 2014

तत्त्वभान ३७ नीतिशास्त्रांची पाने.. १८ सप्टेंबर २०१४


Ethics in philosophy

नीतिशास्त्रांची पाने..
श्रीनिवास हेमाडे 
उपयोजित नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाच्या वृक्षाचीच एक शाखा. प्रत्येक क्षेत्रागणिक अशी निरनिराळी उपयोजित नीतिशास्त्रे, त्यांच्यापुढील निरनिराळे प्रश्न यांची अनेक पाने आज उलगडू लागली आहेत..
            नैतिक संघर्ष व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन पातळ्यांवर होतात. सामाजिक पातळीपेक्षा व्यक्तिगत पातळीवरील नैतिक संघर्ष निरपेक्षपणे व्यक्तीला थेटपणे धारेवर धरतो. सामाजिक पातळीवरील संघर्ष असेच निरपेक्षपणे धारेवर धरले गेले, तर सामाजिक प्रश्नांचे भान प्रत्येक व्यक्तीला म्हणजे समाजाला योग्य ताíकक विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल. 
           देकार्तचे 'तत्त्वज्ञानाचे झाड' ही संकल्पना पाहता आज विसाव्या-एकविसाव्या शतकात या झाडाला आलेली फळे म्हणजे 'उपयोजित नीतिशास्त्र' आणि 'उपयोजित तत्त्वज्ञान' या ज्ञानशाखा, असे आपण आज साधारणपणे म्हणू शकतो. देकार्तने भविष्य वर्तविले म्हणून उपयोजित नीतिशास्त्र आणि उपयोजित तत्त्वज्ञान ही ज्ञानफळे आली आहेत, असे नव्हे. ती आज उपलब्ध झाली, म्हणून त्यांना आपण फळे (किंवा ताजी पालवी) म्हणू. देकार्तला अपेक्षित असलेली सामाजिक नीतीची संकल्पना जास्तीत जास्त स्वयंस्पष्ट, नि:संदिग्ध आणि नि:संशय होईल, अशी मांडणी 'उपयोजित नीतिशास्त्र' या तत्त्वज्ञानाच्या अभ्यास शाखेत केली जाते. 
         प्रत्येक काळात काही विधिनिषेधाचे नियम निर्माण होत असतात, हे लक्षात घेतले, तर नीतिशास्त्राचा इतिहास म्हणजे विधिनिषेधांच्या संकल्पनांचा किंवा नतिक संकल्पनांचा इतिहास असतो. या विधिनिषेधांत नेहमीच बदल होत असतो. तो बदल होण्यामागे सामाजिक, राजकीय, आर्थिक, तंत्र-वैज्ञानिक इत्यादी प्रकारची कारणे असतात. अनेकदा अनेक पातळय़ांवरील हितसंबंध जपण्यासाठीदेखील, समाजातील विशिष्ट वर्गाच्या अपेक्षांचे स्वरूप लक्षात घेऊन नीती आणि अनीतीबद्दल विचार मांडले जातात. जीवन जसजसे गुंतागुंतीचे, संकीर्ण होत जाते, त्यानुसार नीतीच्या संकल्पना आणि त्यांचे उपयोजन जटिल बनते. 'उपयोजित नीतिशास्त्र' या वैचारिक प्रवासाची योग्य दखल घेते, मोठय़ा नैतिक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू पाहते. या सर्वाचे सखोल ताíकक विश्लेषण करून समकालीन समस्या सोडविण्यात मदत करते.
          या नव्या अभ्यास विषयाचा उगम अमेरिका-युरोपात झाला. अमेरिकन समाजात व्यक्तीचे खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यात काटेकोरपणे फरक केला गेला आणि त्यानुसार नैतिक निकष बनविले गेले. आर्थर हॅडली (१८५६-१९३०) या अर्थशास्त्रज्ञ तत्त्ववेत्त्याने तो मुख्यत: केला. त्यानुसार 'व्यवसायाचे नीतिशास्त्र' ही संकल्पना विचारविश्वात रुजली. 
           समाजात व्यवसाय अनेक प्रकारचा आणि अनेक रीतींनी केला जातो. या व्यवसायातील नैतिक पेचप्रसंग पाहता नतिक समस्यांचे वर्गीकरण जैव-वैद्यकीय नीतिशास्त्र, व्यवसाय व धंद्याचे नीतिशास्त्र आणि पर्यावरणाचे नीतिशास्त्र अशा तीन मुख्य शाखांमध्ये करण्यात आले. क्लोनिंग, मानवी अवयवारोपण, मेडिक्लेम, महागडे वाटणारे वैद्यकीय शिक्षण; छोटे-मोठे धंदे ते बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कर्मचारी व कंपनीचे समाजाशी असलेल्या नात्याचे स्वरूप आणि आपली भावी मानवी पिढी, प्राणी-पक्षी जगत, अतिसूक्ष्म जीव, पर्यावरणीय व्यवस्था व एकूण निसर्ग, विश्व यांच्याशी आपले नाते कसे असावे, या नतिक समस्यांच्या चिंतनातून अनुक्रमे या तीन शाखा उदयास आल्या. 
           वैद्यकीय संस्थांची रचना आणि व्यवसाय म्हणून वैद्यक विज्ञानाचे काम यांच्याशी जैव-वैद्यकीय किंवा वैद्यकीय नीतिशास्त्र निगडित आहे. वैद्यकीय नीतिशास्त्रापेक्षा व्यवसाय व धंद्याचे नीतिशास्त्र खूप व्यापक व गुंतागुंतीचे आहे. या दोन्हींपेक्षा व्यापक आहे ते पर्यावरणाचे नीतिशास्त्र. आपली सामाजिक अभिवृत्ती आणि वर्तन, विशेषत: नसíगक साधनसंपत्तीचा वापर करण्याच्या व खाण्यापिण्याच्या मूलभूत सवयी आणि प्राणी व नसíगक जग यांच्या बाबतीत असलेल्या आपल्या नतिक अभिवृत्ती यांचा शोध यात घेतला जातो. या विविध अभिवृत्ती व सवयीमुळे एकूण पर्यावरणाचे आणि एकूण मानवी समाजाचे शोषण कसे होते, यावर पर्यावरणाचे नीतिशास्त्र उपाय शोधू पाहते. 
            व्यवसाय म्हणून वैद्यक व्यवसाय हा व्यवसायाच्या नीतिशास्त्राचा आणि वैद्यकीय नीतिशास्त्राचाही अभ्यासविषय बनतो. या वेळी तो जास्त जटिल होतो. पाश्चात्त्य-युरोपीय राष्ट्रांमध्ये या तिन्हीपकी जैव-वैद्यकीय नीतिशास्त्र महत्त्वाचे ठरले, कारण व्यवसायाचे नीतिशास्त्र तेथे अगोदरच स्पष्ट होते; परंतु या अथवा पर्यावरणाच्या नीतिशास्त्रातील समस्या जागतिक आहेत, तसेच युद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, नववसाहतवाद, रासायनिक-आण्विक प्रकल्प, माहिती तंत्रज्ञान, संगणक, राजकारण, समाजकारण हेही जागतिक प्रश्न आहेत. 
उपयोजित नीतिशास्त्र जसजसे विकसित झाले तसे युद्धाचे नीतिशास्त्र, सार्वजनिक धोरणांचे नीतिशास्त्र, उद्योगसमूहाचे, व्यवस्थापनाचे, राजकारणाचे, समाजकारणाचे नीतिशास्त्र रचले गेले. यातील प्रत्येक क्षेत्र अतिशय व्यापक असल्याने त्यातील जवळपास प्रत्येक घटकाचे नीतिशास्त्र रचावे लागले. व्यक्तिगत पातळीवर सरकारी/ निमसरकारी/ खासगी- नोकरांचे नीतिशास्त्र (उदाहरणार्थ- माधव गोडबोले यांनी 'लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज'मध्ये मांडलेला गोपनीयतेचा मुद्दा), पोलिसांचे नीतिशास्त्र, शिक्षक-प्राध्यापकांचे नीतिशास्त्र, पत्रकारांचे नीतिशास्त्र, लाचलुचपतीतील नीती, भेटी देण्याघेण्यातील नीतिशास्त्र, लेखकाचे नीतिशास्त्र (उदा. भालचंद्र नेमाडेंचा नवनैतिकतावाद व देशीवाद, काहीजणांचा न-नेमाडेवाद, आणखी काही जणांचा नेमाडेद्वेषवाद, नेमाडेपंथीयांचा प्रतिद्वेषवाद), विषयानुसार- विज्ञानाचे नीतिशास्त्र, नवतंत्रज्ञानाचे नीतिशास्त्र, अभियांत्रिकी-जैव अभियांत्रिकीचे नीतिशास्त्र, संगणकाचे नीतिशास्त्र, धर्माचे नीतिशास्त्र, भाषेचे नीतिशास्त्र, ज्ञानाचे नीतिशास्त्र, स्त्रीवादाचे नीतिशास्त्र, माहिती अधिकाराचे नीतिशास्त्र, शेतीचे नीतिशास्त्र अशी अनेक नीतिशास्त्रे अस्तित्वात आली. याखेरीज दारिद्रय़, भूकबळी, अश्लील साहित्यनिर्मिती उद्योग, वेश्या व्यवसाय, स्थलांतरितांचे प्रश्न, फाशी, नागरिकांचा खासगीपणा, जागल्या अशा प्रश्नांमागील नैतिकता यानिमित्ताने ऐरणीवर आली आहे. 
         उपयोजित नीतिशास्त्राच्या संदर्भात भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्याची मुख्य दोन कारणे संभवतात. पहिले, आपण सेवा, व्यवसाय व धंद्याच्या सीमारेखा निश्चित केलेल्या नाहीत. येथे व्यक्तीच्या अत्यंत खासगी धर्मभावना ते राजकारण, समाजकारण (चळवळी, संस्था, एनजीओ इ.), शिक्षण यांचा धंदा होतो. दुसरे, जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणाचा आपण स्वीकार केला आहे; तथापि या सर्वाचे आपणास यथार्थ आकलन झाले आहे, त्याच वेळी आपणास गुंतागुंतीची भारतीय मानसिकता माहीत आहे, येथील सर्वसामान्य जनतेच्या अस्सल गरजा लक्षात घेतल्या आहेत, मग आपण या धोरणांना भारतीय चेहरा दिला व त्यानंतर ती राबविली जात आहेत, असे म्हणता येत नाही. आपण सेवा, व्यवसाय, धंदा आणि जागतिकीकरण यांचा योग्य मेळ घालू शकलेलो नाही. परिणामी येथील सार्वजनिक नतिक समस्या आणखी उग्र बनल्या आहेत. जसे की, भ्रष्टाचार हा तात्त्विक मुद्दा नसून प्रशासकीय रचनेचा आहे आणि व्यावहारिक पारदर्शकता हा नतिक प्रश्न आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरा तीव्र मुद्दा आहे तो उच्चशिक्षणाचे नीतिशास्त्र. प्रबंधांतील वाङ्मयचौर्यात चोर पकडणे कठीण ठरू लागते, कारण चोरी पकडणारे पोलीस, न्यायाधीश चोरांपकीच असू शकतात. थोडक्या लोकांतच हा चोर-पोलीस खेळ रंगतो, त्यामुळे सामान्य जनांपर्यंत काही पोहोचत नाही. 
         भारतीय विद्यापीठांत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात उपयोजित नीतिशास्त्र ही गेल्या दशकात समाविष्ट करण्यात आलेली नवी शाखा आहे. महाविद्यालय पातळीवर ती अनेक ठिकाणी अद्याप रुजायची आहे. उपयोजित नीतिशास्त्र भारतात नवे असले तरी जागतिक पातळीवर अनेक विद्यापीठांमध्ये त्यावर व्यापक काम होत आहे. 
       आजच्या समकालीन सामाजिक, राजकीय, आआर्थिक इत्यादी भारतीय समस्यांचे स्वरूप पाहता उपयोजित नीतिशास्त्र या विचारक्षेत्रातील समस्यांचा अधिक परिचय करून घेणे आपणास उपयुक्त ठरेल. भारतीय वातावरणाशी निगडित विषयांचे स्वरूप क्रमश: पाहू.

Live Paper Link                 E-Paper Link

Thursday 11 September 2014

तत्त्वभान ३६ 'अश्वत्थ: सर्ववृक्षाणां ..' पण पुढे काय ? ११ सप्टेंबर २०१४



अश्वत्थ: सर्ववृक्षाणां ..' पण पुढे काय ?

श्रीनिवास हेमाडे
देकार्तचे झाड ज्ञानाचे फळ असलेल्या सामाजिक नीतीपासून सुरुवात करते आणि शेवटी मूळरूप असलेल्या ईश्वराकडे जाते. देकार्तचे झाड नीतीवर व समाजधारणेवर भर देते, तर श्रीकृष्णाचे झाड ज्ञानावर व मोक्षावर भर देते. 
             ''अश्वत्थ: सर्ववृक्षाणां .. सिद्धानां कपिलो मुनि:'' - ''सर्व वृक्षांमध्ये अश्वथ मी..'' योगेश्वर श्रीकृष्ण संभ्रमित अर्जुनाला उपदेश करतो (गीता १०.२६ विभूतियोग) आणि काही क्षणांनी, तो स्वत:च परम ईश्वर असल्याने आत्मरूपाचे गुह्य़ प्रगट करतो - ''ऊध्र्वमूलमध: शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् (गीता १५.१.. पुरुषोत्तम योग) याचा अर्थ असा : मूळ (जे एक) वर आहे आणि शाखा (ज्या अनेक) खाली आहेत, जो अव्यय (कधीही नाश न पावणारा), छंदासि - म्हणजे वेद ही ज्याची पाने आहेत, असा हा अश्वत्थ वृक्ष जो जाणतो तो पुरुष (जीव) तोच खरा वेदवेत्ता होय. 
          अश्वत्थ म्हणजे पिंपळ. श्रुति-ग्रंथातून परमेश्वराचे येणारे अश्वत्थवृक्षरूपाचे हे वर्णन सांख्य दर्शनातील 'प्रकृतीचा पसारा' जोडून पूर्णत्वास पोहोचते. सृष्टीचा हा पसारा म्हणजेच अश्वत्थ वृक्ष. ''क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे पुरुषोत्तम असतो, त्याला तू जाण! त्याची 'भक्ती' केल्याने जीवन कृतकृत्य होते. तसे, हे पार्था तू कर,'' असे योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतो. पुढे श्रीकृष्ण या अध्यायात ब्रह्मवृक्षाचे सविस्तर वर्णन करतो. पुरुषोत्तम योगाच्या पहिल्या तीन श्लोकांत जणू सार आहे. त्यांचा विनोबांनी सोप्या मराठीत अर्थ सांगितला.

खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला ।
ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ।। १।।
वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ।।
खाली हि मूळे निघती नवीन । दृढावली कर्म-बळे नृ-लोकी ।। २ ।।
ह्य़ाचे तसे रूप दिसे न येथे । भासे न शेंडा बुडखा न खांदा ।।
घेऊनि वैराग्य अभंग शस्त्र । तोडूनिया हा दृढ-मूल वृक्ष ।। ३ ।।

         अफाट भारतीय विचारविश्वातील ज्ञानवृक्षाचे माहात्म्य अगाध आहे. सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त तो बोधिवृक्ष, जैन साहित्यातील चत्यवृक्ष हे ज्ञानवृक्ष मानले गेले. वैदिक साहित्यात मात्र अध्यात्माचे झाड दोन रीतीने आढळते. झाडाची उपमा सुस्पष्ट व निर्णायक रीतीने प्रथम श्रीमद्भागवतगीतेत येते आणि नंतर शुक्रनीतीमध्ये येते आणि ही उपमा निरंतर अनेक पद्धतीने भारतीय साहित्यविश्वात आणि विचारविश्वात येत राहाते. 
         ज्ञानेश्वरीत पंधराव्या अध्यायात पहिली ओवी ते २६५ व्या ओवीपर्यंत अश्वत्थाचे आध्यात्मिक वर्णन आहे. लोकमान्य टिळकांनी (१८५६-१९२०) निरूपण करताना श्रीकृष्णाच्या अश्वत्थमाला ब्रह्मवृक्ष आणि संसारवृक्ष म्हटले असून ते एकच आहेत, असे निवेदन केले. हा अश्वत्थ विचार कुठून कसा आला याची सविस्तर माहिती लोकमान्य देतात. 
          वृक्षाची दुसरी उपमा आढळते ती शुक्रनीतीमध्ये. आचार्य कौटिल्याने राज्याची सात अंगे मानली. स्वामी (राजा), अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड आणि मित्र यांना सप्तांगे किंवा सप्तप्रकृती म्हणतात. थोडय़ाफार फरकाने शुक्र (शुक्राचार्य?), मनु, भीष्म यांनी हेच घटक मान्य केले आहेत. शुक्राने त्यांची तुलना मानवी शरीराशी केली आहे. त्याचबरोबर शुक्राने अन्यत्र राज्याला वृक्षाची उपमा दिली आहे. (राज्य वृक्षस्य नृपतिर्मूलं स्कंधाश्च मंत्रिण: शाखा: सेनाधिपा: सेना: पल्लवा: कुसुमानि च // प्रजा: फलानि भूभागा बीजं भूमि प्रकाल्पिता - शुक्रनीति ५/१२ ..). म्हणजे ''राज्य हा एक वृक्ष आहे, असे कल्पिले तर, राजा हा त्याचे मूळ, मंत्री हा बुंधा, सेनापती- फांद्या, सन्य ही पाने व फुले, प्रजा हे फळ आणि भूभाग ही जमीन. 
        आता, आपल्यापुढील समकालीन समस्या आहे ती या अश्वत्थवृक्ष आणि राज्यवृक्ष या दोन ज्ञानवृक्षांतील कोणते झाड स्वीकारायचे? श्रीकृष्णाचे झाड स्वीकारायचा प्रश्न उरला नाही. तो परंपरेने दिला आहे. त्या झाडाच्या पानांच्या गर्दीत (वैदिक संस्कृतीत) शुक्राचार्याच्या झाडाचे, राज्यवृक्षाचे मूळच उखडले गेले. कुणालाही ते आठवत नाही. ते राज्यशास्त्राचा अभ्यास विषय नाही. लोकांमध्ये ते पसरलेच नाही. त्याचे पुनरुज्जीवन करायचे का? 
      देकार्तने मांडलेली ज्ञानवृक्षाची संकल्पना आपण भारतीय तत्त्वज्ञान समजावून घेण्यासाठी उपयोगात आणता येईल का? श्रीकृष्णाचे झाड पाने, शाखांपासून (वेद्ज्ञानापासून) सुरुवात करते आणि अंतिम टोकाला जाऊन मोक्ष पावते. देकार्तचे झाड ज्ञानाचे फळ असलेल्या सामाजिक नीतीपासून सुरुवात करते आणि शेवटी मूळरूप असलेल्या ईश्वराकडे जाते. देकार्तचे झाड नीतीवर व समाजधारणेवर भर देते, तर श्रीकृष्णाचे झाड ज्ञानावर व मोक्षावर भर देते. 
       देकार्तच्या भाषेत, भारतीय ज्ञानवृक्षाची मुळे म्हणजे भारतीय सत्ताशास्त्र. ते वैदिक उपनिषदे, बौद्ध त्रिपिटके व आगम ग्रंथ आणि जैन सिद्धांत अथवा 'आगम ग्रंथांनी समृद्ध आहे. प्राचीन भारतात काहीएक विज्ञान होतेच. तेव्हा, त्यांना या वृक्षाचा बुंधा मानता तर त्यांनी समाजात कोणती फलरूपी नीती विकसित केली? जे मुळात आहे ते फळात का उतरले नाही? 
          संत परंपरेने, भक्ती संप्रदायांनी कितीही भगवत भक्तीचा महिमा सांगताना आध्यात्मिक समता, बंधुता सांगून लिंगभेदाविरुद्ध आवाज उठवला तरी या साऱ्या शोषक व्यवस्था का टिकून राहिल्या? भारतीयांनी यंत्रे किती शोधली, अभियांत्रिकी किती शोधली, ती समग्र समाजासाठी किती उपयोगात आणली हा शोधाचा, संशोधनाचा विषय आहे; पण प्राचीन भारतीय विचारवंतांनी (आधुनिक भाषेत मांडावयाचे तर 'सामाजिक अभियांत्रिकांनी') भारतीय समाजाचे रूपांतर वर्णजातीिलगभेदाच्या अभेद्य दैवी यंत्रात करण्यात मात्र दिग्विजय मिळविला आहे, असे अतिशय मार्मिक निरीक्षण भारतीय तत्त्ववेत्ते प्रो. सुरेंद्र बारिलगे नोंदवितात. 
भारतीय संस्कृतीचे अत्यंत उच्च दर्जाचे आध्यात्मिक विचार आणि नीच दर्जाच्या राजकीय व सामाजिक आचाराकडे भावनिकदृष्टय़ा न पाहता, फुले-आंबेडकर-शाहू किंवा अन्य कुणी मार्क्‍सवादी, समाजवादी, अन्य भूतदयावादी माणूस ज्या अभिनिवेशाने पाहू इच्छील त्याहीपेक्षा तर्ककठोरदृष्टीची नितांत गरज आहे. उच्च विचारांचे रूपांतर नीच आचारात का होते, याची समीक्षा तुकोबांच्या 'बुडती हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणउनि।' या कारुण्यप्रीतीने झाले पाहिजे. 
       महर्षी शुक्राचार्यानी प्रजा हे राज्याचे म्हणजे राज्यव्यवस्थेचे फळ म्हटले आहे. भारतात या फळाची प्रतवारी काय दर्जाची आहे? स्वरूप पाहिले तर प्रजेला जी काही 'फळे भोगावी' लागतात, त्यामुळे त्यांना ''हेचि फळ काय मम तपाला!'' म्हणायची वेळ येते. विद्यमान राज्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नोकरशाहीने या फळांच्या शोषणाची अशी काही यंत्रणा उभी केली आहे की ही सारी फळे रसहीन, बेचव झाली आहेत. एवढेच नव्हे तर ही प्रजा एकमेकांनाच ओरबाडत आहे. ती श्रीकृष्णाचेही ऐकत नाही आणि संतांचेही ऐकत नाही. एवढा उद्धटपणा आला कुठून? 
      अहिंसेचा विकास हाच संस्कृतीचा विकास असतो. पशु-पक्ष्यासह मानवी आईवडील अिहसक नसते तर मानवी समाजाची किंवा सजीवांची वाढच झाली नसती, असे दामोदर कोसंबी म्हणतात. मग भारतीय समाजातील ही अिहसा गेली कुठे? भारतीय समाज दिवसेंदिवस अगदी डी.जे. लावून परमेश्वराच्या साक्षीने हिंसक का होत चालला आहे? आम्ही सारे ओरबाडसंस्कृतीचे पाईक का होत आहोत? राज्यकर्त्यांमधील प्रजेचे प्रेम गेले कुठे? नेमके काय चुकले? कुठे चुकले? दुरुस्ती कोण, कधी करणार? श्रीकृष्णाने झाड लावले खरे, पण.. पुढे काय ?

Live Paper Link              E-Paper Link