Thursday 27 November 2014

तत्त्वभान ४६ पूर्वार्ध - शेतीचे नीतिशास्त्र - वेद व महाकाव्ये २७ नोव्हेंबर २०१४


Ethics in Agriculture
शेतीचे नीतिशास्त्र - 
वेद व महाकाव्ये

श्रीनिवास हेमाडे 
शेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते. अर्थात, भारतात 'शेतीचे नीतिशास्त्र' असे वेगळे कोणी लिहिले नाही. आहे ते स्फुटलेखन, हेही खरे..
        'शेतीचे नीतिशास्त्र' ही पाश्चात्त्य आणि आंग्लेतर- उर्वरित युरोपीय (काँटिनेंटल) तत्त्वज्ञानातून विकसित होत असलेली संकल्पना आहे. भारतीय शेतकरीवर्ग, शेतकरी संघटना नेते, कार्यकर्ते, धोरणकर्ते, शेती मंत्रालय आणि शासन तसेच अभ्यासक, विचारवंत इत्यादींच्या विचारविश्वात ती नवी आहे, यात शंका नाही. राजकारणात 'शेतकरी राजा' या नामाभिधानाने मिरविणाऱ्यांनाही ती नवी असू शकते. भारतातील विद्यापीठीय-महाविद्यालयीन स्तरावरील अ‍ॅकेडेमिक विश्वातही ती नवीच आहे. 
         'शेतीचे तत्त्वज्ञान' आणि 'शेतीचे नीतिशास्त्र' या नावाची स्वतंत्र विद्याशाखा निर्माण होईल, इतके मुबलक साहित्य वैदिक आणि अवैदिक (तांत्रिक व लोकायतसह) विचारविश्वात उपलब्ध आहे की काय हे शोधावे लागेल. अर्थात भारतीय संस्कृती शेतीप्रधान असल्याचा दावा करताना निश्चित शेतीविचार भारताकडे आहे, असे म्हणावयाचे असते आणि तसे विचार भारतीय वाङ्मयात आहेत. पण ते सारे स्फुटलेखन आहे. त्या लेखनाचे स्वरूप पाहू. 
        वेदविषयक साहित्यात भूमिसूक्त, कृषिसूक्त व अक्षसूक्त या तीन सूक्तांमध्ये पर्यावरणविचार व शेतीविचार आणि अन्यत्र काही तुरळक आनुषंगिक विचार मांडला आहे. अथर्ववेदातील भूमिसूक्त (अथर्ववेद १२.१) पृथ्वी ही सर्वाची आई असल्याचे सांगते ('माता भूमि: पुत्रो? हं पृथिव्या:'). ही भूमिमाता सर्व पाíथव पदार्थाची जननी व पोषण करते, प्रजेचे सर्व प्रकारचे क्लेश, दु:खे, अनर्थ यांपासून संरक्षण करते. 
         ऋग्वेदात दोन सूक्ते आहेत. पहिल्या, कृषिसूक्तात (ऋग्वेद ४.५७) शेतीचा उल्लेख 'मानवाचे सौभाग्य वाढविणारी' असा आहे. नांगरलेल्या जमिनीवर इंद्राने चांगला पाऊस पाडावा, तसेच सूर्याने आपल्या उत्कृष्ट किरणांनी तिचे रक्षण व संवर्धन करावे, अशी इच्छा या सूक्तकर्त्यांने केली आहे. बल नांगराला जोडणे, नांगरटीस सुरुवात करताना, नांगराची पूजा करताना हे सूक्त म्हटले पाहिजे. ऋग्वेदातील दुसऱ्या 'अक्षसूक्त' (१०.३४) मध्ये जुगाऱ्याला केलेला उपदेश या स्वरूपात शेतीचा उल्लेख आहे. कुणी कवष ऐलूषच्या नावावरील ते सूक्त १४ ऋचांचे असून जुगारी आणि अक्ष म्हणजे फासे यांचे दोष व दुष्परिणाम मार्मिक रीतीने दाखविताना उपदेश केला आहे, की 'शेती कर. फासे खेळू नकोस, संपत्ती असेल तिथेच गायी आणि बायको राहतात.' 
       'अन्नदानसूक्ता'त (ऋग्वेद १०.११७) किंवा धनान्नदान सूक्त या नऊ ऋचांच्या सूक्तात स्वार्थी, अप्पलपोटय़ा माणसाची िनदा केली आहे. स्वार्थीपणा करणे म्हणजे दुसऱ्याचा वध करणे होय, असे सांगून अन्नदानाची महती स्पष्ट केली आहे. या सूक्तास 'भिक्षुसूक्त' म्हणतात. हा श्रीमंतांना केलेला उपदेश आहे. पूर्वजन्माच्या पापामुळे दारिद्रय़ भोगावे लागते, या भयानक गरसमजुतीला जोरदार तडाखा देणारे हे सूक्त आहे. मृत्यू केवळ गरिबांनाच येतो, श्रीमंतांना येत नाही असे नाही. उलट लक्ष्मी चंचल असल्यामुळे श्रीमंत माणूसही क्षणात दरिद्री होऊ शकतो. म्हणून जवळ धन व अन्न असेपर्यंत धनवानाने गरिबांना धन, अन्न यांची दानरूपाने मदत करावी व गरिबांशी मत्री करावी, तेच मित्र आपल्या गरिबीत उपयोगी येतात, असे यात सांगितले आहे. नि:स्वार्थी समाजकर्तव्य सांगणारे हे सूक्त आधुनिक काळातही यथार्थ आहे. 
           सरस्वतीचा उल्लेख नदी आणि देवी असा येतो. सरस्वती म्हणजे सरोवराच्या काठी राहणारी देवता किंवा स्त्री-समूह, पर्यायाने नदीकिनारीची वस्ती. विश्वामित्रनदीसंवाद या सूक्तात महर्षी विश्वामित्र नदीला आई मानतात. अथर्ववेदातील काही मंत्रांना 'पौष्टिक मंत्र' म्हणतात. शेतकरी, धनगर, व्यापारी इत्यादी व्यावसायिकांना यश मिळावे, अशी भावना त्यातून व्यक्त होते. पाकयज्ञ, ग्रामनगरसंवर्धन, कृषिसंवर्धनाचे मंत्र यात आहेत. 
        ऋग्वेदाचा समग्र अर्थ लावणारे 'ऋग्वेदभाष्य'कार आणि शृंगेरीमठावरील आचार्य सायणाचार्य (मृत्यू १३८७) यांनी वेदांतील ब्रह्मणस्पती या देवतेला अन्नपती म्हटले आहे. ही शेतीदेवता आहे. त्यांच्या मते, ब्रह्म म्हणजे सतत वाढणारे! जे सतत वाढते ते अन्नच असते. सायणाचार्य 'ब्रह्म स्तोत्ररूपमन्नं हविर्लक्षणमन्नं वा' अशी व्याख्या करतात. स्तोत्ररूप अन्न हे ब्रह्म आहे आणि आहुती दिले जाणारे अन्न हेसुद्धा ब्रह्मच आहे. पुढे ते म्हणतात, 'अन्नस्य परिवृद्धस्य कर्मण: पति पालयिता' (अन्ननिर्मितीच्या कर्माचे पोषण करणारा म्हणजे शेतकरी.) 'बृह' धातू आणि 'बृंह्' धातू यांचा समान अर्थ वाढत जाणे. 'बृह' धातूपासून ब्रह्म, ब्राह्मण, ब्राह्मणस्पती, बृहस्पती असे शब्द बनतात. म्हणून सायणाचार्य अन्न पिकवितो तो ब्राह्मणस्पती असे म्हणतात. शेतकऱ्याचे ब्रह्म जीवनधारणेशी जोडलेले म्हणून ते अन्न हेच ब्रह्म हे समीकरण या होते. उपनिषदात एके ठिकाणी 'अन्नं ब्रह्म' असे म्हटलेले दिसते. शंकराचार्यानी अन्नपूर्णाष्टकम स्रोताची रचना केली. आर्य शब्दाचा मूळ अर्थ पेरणी करणारा कृषक असा होतो. कुणीतरी पृथुवैन्य नामक आर्य तत्कालीन कृषिक्रांतीचा जनक मानला जातो.
      सुप्रसिद्ध विचारवंत स. रा. गाडगीळ यांच्या मते बहुतेक ऋचांमध्ये, सूक्तांमध्ये अन्नाचीच इच्छा दर्शविली जाते. या ऋषींचे विचार आणि देवदेखील अन्नाचे रूप धारण करतात. युजर्वेदाच्या एका भागाला वाजसनेयी संहिता असे नाव आहे. वाजसन म्हणजे कृषक. वाजपेय यज्ञ म्हणजे अन्न आणि पेय म्हणजे पाणी यासाठी केला जाणारा विधी. तंत्र या शब्दाचा मूळ अर्थही शेती करणे असाच असावा.
          रामायणातील कृषिसंस्कृतीसुद्धा सूचक आहे. सीता म्हणजे नांगरट न झालेली जमीन म्हणून व उपजाऊ सकस जमीन, सीताराम = नांगर वापरून कृषितंत्र जाणणारा, अहल्या = नांगर न फिरलेली, भरड जमीन, तारा = नदीच्या मध्यातील खुली जमीन, मंदोदरी (मंद + उदरी) = विलंबाने पिके देणारी जमीन, द्रौपदी ही जमिनीचेच प्रतीक होती. (जमीन भावांपकी कुणीही कसली तरी तिच्यावर केवळ थोरल्या भावाचाच हक्क असावा, या पुरुषी संस्कृतीला कुंतीने समान वाटणी करून जमिनीच्या तुकडीकरणाचा दावा हाणून पडला.) 
         महाभारतातील बलराम हा नांगरधारी शेतकरीच होता. क्षत्रिय हा शब्दसुद्धा क्षेत्र जो कसतो तो. बौद्ध वाङ्मयातील खेताचा अधिपती तो खत्तीय अशी व्याख्या आहे. कामधेनु = ही जंगले तोडून वस्ती करणारी शेतकऱ्यांची संस्कृती. क्षेत्र कसतो तोच क्षत्रिय, त्याला बौद्ध संज्ञा खत्तीय,हिंदीत शेताला खेत म्हणतात. ऋग्वेदातील मुख्य पशुदेव म्हणजे वृषभ - बल आणि गाय याच आहेत. कामधेनू ही संकल्पनासुद्धा जंगले तोडून मानवी वस्ती करणारी व शेती पिकविणाऱ्या कृषिकांची म्हणजे शेतकऱ्यांची संस्कृती होती. या साऱ्या संदर्भात 'कृषिकेंद्रित वैदिक धर्म आणि संस्कृती' हे प्र. म. ना. लोही यांचे पुस्तक उपयुक्त आहे. 
        आता, हे आणि असे अन्य काही वैचारिक साहित्य 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' या नावाची नवीन वैचारिक घटना निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल का? असा प्रश्न उपस्थित करता येईल. या वैचारिक साहित्यातही अवैदिकांपकी केवळ चार्वाक दर्शनात सुस्पष्ट रूपात शेती, उद्योग, व्यवसायविषयक सामाजिक व नैतिक धोरण दिसते. तेव्हा भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे कसे शक्य होईल, ते या लेखाच्या उत्तरार्धात पाहू.
(उत्तरार्ध पुढील गुरुवारी)


Thursday 20 November 2014

तत्त्वभान ४५ शेतीचे नीतिशास्त्र २० नोव्हेंबर २०१४

शेतीचे नीतिशास्त्र

श्रीनिवास हेमाडे 

               शेती वैयक्तिक मालकीची असूही शकेल, पण लोकशाही आणि 'जगण्याचा समान हक्क' मानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या शाखेच्या रुजवणीपासून आतापर्यंतची वाटचाल विचारांनी भारलेली आहेच..

शेती व्यवसायाचा आणि तत्त्वज्ञानाचा संबंध काय? याची दोन उत्तरे शक्य आहेत. पहिले असे की शेती करणे ही मूलभूत नतिक कृती आहे. त्यामुळे शेतीचे नीतिशास्त्र रचणे, त्या शास्त्राची बौद्धिक मांडणे करणे यातून शेतीचा तत्त्वज्ञानाशी संबंध येतो. दुसरे म्हणजे शेती करण्यामागील मानवी बौद्धिक श्रम लक्षात घेऊनच शेतीचे तत्त्वज्ञान ही नवी ज्ञानशाखा विकसित होते. ही मांडणी लिंडसे फालवेय् (१९५०) या ऑस्ट्रेलियन विचारवंताने केली. 
शेतीचे नीतिशास्त्र ही मुख्यत सार्वजनिक धोरणांशी निगडित असलेल्या नैतिक समस्यांवर शक्य असलेल्या उपाययोजनांची तात्त्विक आणि नैतिक दृष्टिकोनातून चर्चा करणारी उपयोजित नीतिशास्त्रातील नवी उगवती उपशाखा आहे. अन्नाचे उत्पादन आणि इतर औद्योगिक उत्पादनासाठी नसíगक, जैविक साधनसंपत्ती यांचा वापर केला जात असताना दूरदर्शीपणा, रास्तपणा आणि मानवी चेहरा टिकविणारे व्यवस्थापन कसे होईल, याच्याशी ते निगडित आहे. शेतीविषयक धोरणे ही नेहमीच सार्वजनिक धोरणे असतात,याचे भान शेतीचे नीतिशास्त्र विकसित करते.
बेन मेफम (विद्यमान) या शेतीतज्ज्ञ आणि तत्त्ववेत्त्याच्या मते, इतर कोणत्याही उद्योगधंद्यातील उत्पादनापेक्षा 'अन्न' हे शेती संस्कृतीचे उत्पादनाचे स्वरूप मूलत वैशिष्टय़पूर्ण आहे. इतर मानवी उत्पादनाच्या तुलनेत अन्न हे प्रत्येक मानवाला आणि मानवेतर जिवांना केवळ विधायक अर्थाने जगण्याचा मूलभूत हक्क देते. परिणामी अन्न हेच केवळ निखळ, नि:संशय, निसंदिग्ध, निरपेक्ष, सुस्पष्ट नैतिक दर्जा असणारे एकमेवाद्वितीय उत्पादन आहे.
शेतीच्या नीतिशास्त्राचे उद्दिष्ट सामाजिक कराराच्या संदर्भात सार्वजनिक धोरण ठरविणे आणि त्या धोरणाचा सविस्तर आराखडा निश्चित करण्यासाठी समर्पक ठरू शकेल अशी, सुसंगत आणि एकात्म नतिक चौकटीची योजना करणे, हे आहे. इथे सामाजिक करार याचा अर्थ सामाजिक सहकार्य, कायदेशीर रक्षण आणि उचित प्रशासन राबविण्याकरिता समाजातील सर्व सदस्यांनी एकमेकांत केलेला अलिखित करारनामा असा आहे. असा करार लोकशाहीतच कल्पनीय असल्याने, शेतीचे नीतिशास्त्र ही लोकशाही जीवनशैलीतच शक्य असणारी तात्त्विक विचारसरणी आहे. गरिबातील गरीब नागरिकालाही परवडणारे सुरक्षित, पोषक अन्न पुरविणे हे लोकशाहीचे काम असते. त्यामुळे करार करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि शासन यांच्यात टोकाचे मतभेद असले तरी ते किमान मुद्दय़ावर एकत्र येणे, हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी नेहमीच हितावह असेल; अशा सामंजस्याचा सामाजिक करार राबविला गेला पाहिजे. मेफमच्या मते, या प्रक्रियेत नतिक भूमिका म्हणजे योग्य धोरणे ठरविणे हे नाही तर, प्रस्तावित विशिष्ट धोरणे नैतिकदृष्टय़ा स्वीकारणे समर्थनीय आहेत की नाहीत याचे मूल्यमापन करण्यासाठी मदत करणारे नैतिक सिद्धान्त रचणे असते. 
मेफमच्या निरीक्षणानुसार जमिनीची मालकी, जमिनीचे शोषण आणि या शोषणाचा तिच्या उपजक्षमतेवर होणारा परिणाम या तीन मुख्य घटकांमधून शेतीविषयक अनंत नतिक समस्या उद्भवतात. मेफमच्या मते, शेतीविषयक नैतिक समस्यांचे तीन गट आणि शेतीविषयक नैतिक सिद्धान्ताचे असे दोन गट अधोरेखित करता येतील. यापैकी 'नतिक समस्यां'चे उपगट असे: (१) आíथक-सामाजिक रचना [न्याय कुणाला? कसा?](२) जैवनीतिशास्त्रीय दृष्टिकोन [प्रामुख्याने जैवतंत्रज्ञानाच्या उपयोजनामुळे व इतर प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या.](३) शेती-पर्यावरणीय दृष्टिकोन [शेतीचा भौतिक तसेच सामाजिक पर्यावरणावर होणारा परिणाम ].
नैतिक सिद्धांताचे असे दोन गट असे : (२)प्रक्रियाकेन्द्री आणि (२) आशयकेन्द्री.  प्रक्रियाकेन्द्री नैतिक सिद्धान्त म्हणजे घेतले जाणारे निर्णय गटबाजीचे व हितसंबंधी आहेत की सार्वजनिक हिताचे आहेत, यापेक्षा निर्णय कसे घेतले जातात याच्याशी संबंधित असणारे (वैधानिक बहुमत, शेतकऱ्यांच्या वा राजकीय संघटना, पक्ष तसेच एखाद्या उद्योगसमूहाचा विविध प्रकारचा दबाव वा छोटय़ा गटात 'दादा'गिरी, साहेबांचे 'एक'मत). आशयकेन्द्री नैतिक सिद्धान्त म्हणजे प्रस्तावित धोरणांचा तपशीलवार आशय विचारात घेऊन रचला जाणारा सिद्धान्त (उपयुक्ततावादी किंवा कर्तव्यतावादी). दुसऱ्या प्रकारचे पुन्हा आणखी काही उपप्रकार आहेत.
पॉल थॉमसन या अमेरिकन शेतीनीतिज्ञाच्या मते, शेतीच्या नीतिशास्त्रात अभ्यासल्या जाणाऱ्या समस्यांचे तीन विभाग आहेत : (१) मानवी आरोग्य आणि सुरक्षा (२) पर्यावरण ऱ्हासाचा व्यापक प्रश्न (३) एक जीवनमार्ग म्हणून आणि कुटुंब, चालीरीती इ. विविध सामाजिक संस्थांशी असलेला शेतीचा संबंध पाहता शेतीची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक उचितता, हे आहेत. पहिला विभाग, साधे रोजचे जेवण, ठरविलेला आहार, पोषण व अन्न सुरक्षा याच्याशी निगडित आहे. दुसरा विभाग, शेतीविषयक पर्यावरणीय व्यवस्था आणि त्या बाबतचे माणसाचे उत्तरदायित्व (प्राण्यांचा जगण्याचा हक्क, शाकाहारवाद इ.), तिसरा विभाग, शेतीचे औद्योगिकीकरणाशी (कॉर्पोरेटीकरण) निगडित आहे.
थॉमसनच्या मते, शेतीविषयक नैतिक विचारांचा इतिहास झेनोफोन (इ.स.पू. ४४४-३७५) आणि अ‍ॅरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४-३२२) यांच्यापासून सुरू होतो. मग तमोयुगाचा काळ वगळता हा इतिहास लॉर्ड फ्रान्सिस बेकन (१५६१-१६२६) पासून पुन्हा सरू होतो. बेकनने विज्ञान आणि शेतीविकास या संबंधात पहिले सविस्तर यथार्थ लिखाण केले. लागवड-मशागतीचा पहिला वैज्ञानिक ग्रंथराज शेतीतज्ज्ञ जेथ्रो टूल (१६२७-१७४१) याने १७३३ साली लिहिला. जॉन लॉक (१६३२-१७०४), मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५), हेगेल (१७७०-१८३१), थॉमस माल्थस (१७६६-१८३४), बेंथम (१७४८-१८३२), जॉन स्टुअर्ट मिल (१८०६-१८७३) यांनी विविध अंगांनी शेतीविषयक मतप्रदर्शन केले. तथापि अनेक गतकालीन तत्त्ववेत्त्यांच्या शेतीविषयक लेखनाकडे समाजाचे आणि शासनाचे दुर्लक्ष झाले, अशी खंत थॉमसन व्यक्त करतो. विज्ञान-तंत्रज्ञानाशी लगटून असूनही शेतीच्या नीतिशास्त्राच्या तात्त्विक इतिहासात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. 
त्यानंतर थेट विसाव्या शतकात ग्लेन एल जॉन्सन (१९१८-२००३) या शेती अर्थशास्त्रज्ञाने शेतीविज्ञानावर अनेक चांगल्या, विधायक लेखमाला लिहिल्यानंतर या विषयाकडे लोकांचे लक्ष गेले. वेन्डेल बेरी या कवी-कादंबरीकाराने लिहिलेल्या 'द अन-सेटलिंग ऑफ अमेरिका' (१९७७) या ग्रंथात औद्योगिक शेती, विद्यापीठांना मोठय़ा जमिनी दान करणे आणि आधुनिक शेतीविज्ञान यावर तात्त्विक मर्मग्राही टीका केली. त्यामुळे तत्त्ववेत्त्यांचे शेतीतील नतिक नैतिक समस्यांकडे लक्ष वेधले गेले. लिबर्टी बेले (१८५८-१९५४) हा अमेरिकन शेतीशास्त्रज्ञ, सर अल्बर्ट हॉवर्ड (१८७३-१९४७) यांच्या 'अ‍ॅन अ‍ॅग्रिकल्चरल टेस्टामेंट' आणि 'सॉइल अँड हेल्थ' या ग्रंथांनी मोठी क्रांती केली. पीटर सिंगर, ओनोरा ओनील आणि अमर्त्य सेन (सर्व विद्यमान) यांनी भूकबळीची समस्या हाताळली. गॅरेट हार्डीन (१९७५-२००३) आणि नॉर्मन बोरलॉग यांनी लोकसंख्या वाढ आणि अन्न उत्पादन प्रक्रियेतील तणावाचे विश्लेषण केले. राशेल कारसन (१९०७-१९७६) या विदूषीने शेतीच्या विषारीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणला. कॅरोलिन साख या विदूषीने आणि भारतात वंदना शिवा यांनी पहिल्यांदा शेतीचा स्त्रीवादी अभ्यास पुढे आणला. नंतर थॉमस रुहेर, अ‍ॅलन रोसेनफिल्ड यांनी प्रथम शेतीचे नीतिशास्त्र ही नवी विद्याशाखा १९८० मध्ये शिकविण्यास सुरुवात केली. १९९० मध्ये गॅरी कॉमस्टॉक यांनी शेती नीतिशास्त्रावर शेकडो कार्यशाळा घेतल्या. पॉल थॉमसन हा पहिला तत्त्वज्ञ अधिकृतरीत्या टेक्सास- मध्ये शेती नीतिशास्त्रज्ञ म्हणून नेमला गेला. बेन मेफम यांनी १९९० मध्ये जागतिक परिषद आयोजित केली. १९९८ मध्ये प्रथम 'द युरोपियन सोसायटीफॉर अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड एथिक्स' स्थापन झाली. २००० मध्ये ' द जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड एन्व्हायर्न्मेंटल एथिक्स'चा पहिला अंक दिमाखात प्रकाशित झाला. 'एन्सायक्लोपीडिया ऑफ फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर एथिक्स 'ची पहिली आवृत्ती १९९८ मध्येच आली होती, तर या वर्षी - २०१४ साली त्याची नवी आवृत्ती आली. 
    भारतात काय घडले ते पुढील लेखात !

Wednesday 12 November 2014

तत्त्वभान ४४ पर्यावरण नीतिशास्त्र १३ नोव्हेंबर २०१४

डॉ. अल्बर्ट श्वायत्झर

पर्यावरण नीतिशास्त्र 
श्रीनिवास हेमाडे 
'पारंपरिक सद्गुण वेगळे आणि पर्यावरणनिष्ठ सद्गुण वेगळे' अशी टोकाची भूमिका घेण्याच्या टप्प्यावर नीतिशास्त्राची ही शाखा आज पोहोचली आहे..हा झगडा मात्र नव्हे. तो दृष्टिकोनातील फरक आहे, हे समजून घ्यायला हवे..
               पर्यावरणाचा विचार पर्यावरणवाद आणि पर्यावरण अध्ययन यात होतो. पण पर्यावरण नीतिशास्त्र त्यापेक्षा भिन्न दृष्टिकोनातून मानव आणि परिसर यांच्या नात्याचा शोध घेते. पर्यावरणवाद (Environmentalism) हा पर्यावरणविषयक विविध सिद्धांत, पर्यावरण प्रणाली आणि सामाजिक चळवळी यांचा समावेश असलेले व्यापक स्वरूपाचे तत्त्वज्ञान आहे. दबाव गट स्थापन करणे, चळवळी करणे आणि प्रशिक्षण देणे ही कामे पर्यावरणवाद करतो. पर्यावरण अध्ययन (Environmental studies) ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरणाचा अभ्यास करणारी शाखा आहे. पर्यावरण नीतिशास्त्र हा तत्त्वज्ञानाचा हिस्सा आहे. नीतीविषयक विचारांची कक्षा केवळ मानवापुरती न ठेवता, मानवासह मानवेतर सजीवांनाही सामावून घेईल अशी व इतकी व्यापक करावी, असे मध्यवर्ती धोरण स्वीकारावे; असा धोरणात्मक नैतिकतेचा आग्रह धरणारी ही उपयोजित नीतिशास्त्राची शाखा आहे. पर्यावरणविषयक कायदे, पर्यावरण समाजशास्त्र, पर्यावरण धर्मशास्त्र, पर्यावरण अर्थशास्त्र, पर्यावरण भूगोल व खुद्द पर्यावरण विज्ञान अशा अनेक सामाजिक व नसíगक विज्ञानांचा चिंतनविषय असणारे हे आंतरविद्याशाखीय नीतिशास्त्र आहे. जैवनीतिशास्त्र, व्यावसायिक नीतिशास्त्र, धंद्याचे नीतिशास्त्र व अभियांत्रिकी नीतिशास्त्र यांच्याशी त्याचा अतिशय गुंतागुंतीचा संबंध आहे. 
         सन १९१५ मध्ये डॉ. अल्बर्ट श्वायत्झर (१८७५-१९६५) या जर्मन डॉक्टर तत्त्ववेत्त्याने मांडलेला 'जीवनविषयक पूज्यभाव' (The Reverence for Life) हा विचार जगातील पहिला पर्यावरणनीतीचा विचार मानला जातो. जीवन या संकल्पनेत श्वायत्झर यांनी पृथ्वी आणि सर्व सजीव सृष्टीचा समावेश केला. त्यानंतर पॉल टेलर (१९२३.) या अमेरिकन विचारवंताचा 'निसर्गाविषयीचा आदर' सिद्धांत, आल्डो लिओपोल्ड (१८८७-१९४८) या विख्यात पर्यावरण तत्त्ववेत्त्याच्या दि सॅण्ड कौंटी अल्मॅनक (१९४९) या पुस्तकातील भूमी नीती (Land Ethics) सिद्धांत आणि राशेल कार्सन या सागर जीवशास्त्रज्ञ विदुषीच्या Silent Spring (१९६२) या पुस्तकांनी या विषयाला तोंड फुटले. नंतर Science या अमेरिकन नियतकालिकात 'दि हिस्टॉरिकल रूट्स ऑफ आवर इकोलॉजिक क्रायसिस' (१९६८) या लिन व्हाइट्स आणि गॅरट हार्डीन या प्राणिशास्त्रज्ञ पर्यावरणतज्ज्ञाच्या (१९१५-२००३) 'दि ट्रॅजेडी ऑफ दि कॉमन्स' (१९६८) या निबंधाने आणि 'एक्स्प्लोिरग न्यू एथिक्स फॉर सरव्हायवल : दि व्हायेज ऑफ दि स्पेसशिप बिगल' (१९७२) या पुस्तकाने या विद्याशाखेच्या अभ्यासाचा पाया रचला. विशेषत: राशेल कार्सनने डी.डी.टी. व इतर रासायनिक औषधांमुळे पिके विषारी बनणे, मानव व मानवेतर प्राणी नष्ट होण्याचा सिद्धांत मांडल्यानंतर पॉल एलरीचच्या The Population Bomb या पुस्तकाने भर घातली. आणि १९७० च्या पहिल्या जागतिक वसुंधरा दिन परिषदेनंतर पर्यावरणाचे नीतिशास्त्र या यथार्थ नावाने ही नवी विद्याशाखा अस्तित्वात आली. स्कॉटिश भूगर्भशास्त्रज्ञ जेम्स हटन (१७२६-१७९७), रशियन भूरसायनशास्त्रज्ञ व्लादिमिर वेर्नाद्स्की (१८४५-१९६३), ब्रिटिश शास्त्रज्ञ जेम्स लव्हलॉक (१९१९) व त्याच देशातील पत्रकार, छायाचित्रकार गाय मूरची (१९०७-१९९७), तत्त्ववेत्ते स्टीफन क्लार्क (१९४५) तसेच अमेरिकी जीवशास्त्रज्ञ लिन मार्गुलीस (१९३८-२०११) यांच्या पर्यावरणविषयक मांडणीतून विसाव्या शतकात गय्या नीतिशास्त्र विकसित झाले. गैय्या (Gaia) म्हणजे ग्रीक भाषेत पृथ्वी किंवा भूदेवी. १९७० साली अमेरिकेत Environmental Ethics हे नियतकालिक सुरू झाले. 
          पर्यावरण नीतिशास्त्र मुख्यत: पाच समस्यांचा अभ्यास करते. (१) विविध प्रकारचे प्रदूषण (२) नसíगक साधनसंपत्तीचा दुरुपयोग (३) वाढती लोकसंख्या (४) प्राण्यांविषयी माणसाची अभिवृत्ती आणि माणूस त्यांना देत असलेली वागणूक (५) विविध प्रकारच्या पर्यावरण प्रणालींचे स्वयंसिद्ध मूल्य. पर्यावरण नीतिशास्त्र या विद्याशाखेत ईश्वरकेंद्रवाद, मानवकेंद्रवाद, जैवकेंद्रवाद आणि पर्यावरणकेंद्रवाद हे निव्वळ अ‍ॅकेडेमिक सिद्धांत आणि प्राण्यांचे हक्क, शाकाहारवाद, प्राण्यांवरील प्रयोगांबाबत नतिक धोरणे तसेच शाश्वत विकास ही संकल्पना, उथळ पर्यावरणवाद विरुद्ध सखोल पर्यावरणवाद हे चळवळीतून निष्पन्न होणारे मुद्दे अभ्यासले जातात. अर्थात विविध देशांतील विद्यापीठांच्या व सरकारच्या धोरणांनुसार काही बदल होतात, पण साधारणत: हे समान मुद्दे असतात. 
       'स्त्रीवादी पर्यावरणवाद' हा या नीतिशास्त्राचा विकसनातील महत्त्वाचा टप्पा आहे. फ्रान्को डी युबोनी (१९१२-२००५) या फ्रेंच स्त्रीवादी लेखिकेने ज्याचा साधारण अर्थ स्त्रीवाद किंवा मृत्यू असा होतो, अशा शीर्षकाच्या पुस्तकात उपयोगात आणलेल्या फ्रेंच संज्ञेचे ecofeminism हे इंग्लिश भाषांतर. स्त्रीचे अवमूल्यन व पृथ्वीचे अवमूल्यन यांतील साम्य अधोरेखित करून त्या साम्यावर व पुरुषप्रधानतेवर युबोनीने प्रहार केला.
       विसाव्या शतकात या सर्व मांडणींना लोउक फोन वेनस्वीन या नेदरलँड्स येथील संशोधिका आणि पर्यावरण नीतिशास्त्रज्ञ विदुषीने अत्यंत वेगळी कलाटणी दिली आहे. तिने पर्यावरण सद्गुण नीतिशास्त्र (Environmental virtue ethics) ही नवी मांडणी पुढे आणली. ती अमेरिकेतील काही विद्यापीठे व शिक्षण संस्थांप्रमाणेच उद्योग समूहांत शिकविली जात आहे. परिणामी पर्यावरण नीतिशास्त्राकडे, चळवळींकडे पाहण्याचा अभ्यासकांचा व पाश्चात्त्य राष्ट्रांतील सरकार वा धोरणकत्रे यांचा दृष्टिकोन बदलला, तो अधिक पूरक आणि जास्तीत जास्त वास्तव बनला. 
        वेनस्वीनच्या मते, आजपर्यंतच्या पर्यावरण-विषयक सद्धान्तिक मांडणीमध्ये तत्त्ववेत्ते, विचारवंत, कार्यकत्रे, बिगरसरकारी संस्था इत्यादी संबंधित मंडळींनी जी भाषा वापरली त्या भाषेचे आज नव्याने विश्लेषण करणे आवश्यक आहे. तिच्या मांडणीनुसार पर्यावरण नीतिशास्त्रज्ञ, कार्यकत्रे, बिगरसरकारी संस्था इत्यादी संबंधित मंडळी पारंपरिक सद्गुणांची मूल्यजड भाषा वापरण्याची सवय असते आणि हजारो वष्रे तीच ती भाषा वापरली गेल्याने लोकांवर तिचा काहीही परिणाम होत नाही, ती भाषा अतिशय उथळ, गुळमट, निष्प्रभावी बनते. उलट ते नैतिक संकल्पनांची चेष्टा करतात, म्हणजे नैतिकतेची चेष्टा करतात. गांभीर्याने घेत नाहीत. त्यासाठी ही नीतीची परिभाषेची पुनर्रचना करता येईल आणि ही नतिकता प्रत्यक्ष सार्वजनिक धोरणप्रक्रियेत आणि दैनंदिन जीवनात कशी अमलात येईल, हा प्रकल्प राबवला पाहिजे. याबाबतचे वेनस्वीनने लिहिलेले क्रांतिकारक पुस्तक म्हणजे 'डर्टी व्हर्च्यूज : द इमर्जन्स ऑफ इकॉलॉजिकल व्हर्च्यू एथिक्स' (१९९७). यातील 'डर्टी व्हर्च्यूज' म्हणजे 'अस्वच्छ/ घाणेरडे सद्गुण' असे नसून 'डर्ट' म्हणजे माती, पर्यायाने पृथ्वी. म्हणून 'डर्टी व्हर्च्यूज' म्हणजे पृथ्वीविषयक सद्गुणशास्त्र. 
      पर्यावरणविषयक साहित्याचे व्यापक सर्वेक्षण करून वेनस्वीनने विद्यमान पर्यावरण सद्गुणवादी सिद्धांताला जुळणाऱ्या मूळतत्त्वांचा समावेश करणारी नवी 'हरित सद्गुण भाषा' रचण्याचा आधुनिक प्रस्ताव दिला आहे. या पुस्तकात तिने अशा १८९ सद्गुणांचा आणि १७४ दुर्गुणांची यादीच जोडली आहे. आजपर्यंत मांडलेल्या हजारो सद्गुणवादी संकल्पनांच्या जंजाळामधून नेमकी परिभाषा आजच्या पर्यावरण युगात वापरणे, याचा अर्थ आपली भूमिका नेमकी, नेटकी करणे, असे ती मांडते. 
        भारतात 'वृक्ष-वल्ली आम्हां सोयरी वनचरें' अशा अंगाने जाणारे आदरणीय नैतिक विचार प्राचीन काळापासून मांडण्यात येतात, हे खरे आहे. पण एखादा विचार गोड काव्यात मांडणे आणि तोच सार्वजनिक धोरण, जीवनरीत म्हणून सरकार आणि लोकांनी स्वीकारणे या दोन कृतींमध्ये फरक केला पाहिजे. वैदिक यज्ञ संस्कृतीतील हिंसेला उत्तर म्हणून अहिंसा व प्रेम हे जीवनधोरण म्हणून नीतिशास्त्र मांडले ते केवळ जैन आणि बौद्ध धर्माने. झेन बुद्धिझम व पर्यावरण नीती यावर पाश्चात्त्य चर्चाविश्वात प्रचंड संशोधन झाले आहे, चालू आहे.


Wednesday 5 November 2014

तत्त्वभान ४३ राजकीय नीतिशास्त्र ०६ नोव्हेंबर २०१४

राजकीय नीतिशास्त्र
श्रीनिवास हेमाडे
राजकीय नीतिशास्त्र ही केवळ एक अभ्यासशाखा नव्हे. राजकीय क्षेत्राच्या सुधारणेसाठी कॅनडासारख्या देशाने धोरणातच राजकीय नीतिशास्त्राचा अंतर्भाव केला. त्या देशात 'नतिक सल्लागार कार्यालया'ला वैधानिक दर्जा आहे. अर्थात, अभ्यासक मंडळी राजकीय नीतिशास्त्रात महत्त्वाची भर घालण्याचे काम करीत आहेतच..
         विसाव्या शतकात उपयोजित नीतिशास्त्रातील एक कळीचा विषय म्हणून स्वतंत्रपणे राजकीय नीतिशास्त्र ही नवी संकल्पना चर्चाविश्वात पुढे आली. ती अद्यापि बाल्यावस्थेत असली तरी तिने पाश्चात्त्य चर्चाविश्वात अतिशय सशक्त बाळसे धरले आहे. 
           या संकल्पनेची रुजवात गिब्सन विंटर या अभ्यासकाने 'ए प्रपोजल फॉर ए पोलिटिकल एथिक्स' या निबंधाने केली. त्याने 'राजकीय नीतिशास्त्राचे विज्ञान' असा शब्दप्रयोग केला. त्याची मांडणी पॉल रिकर या तत्त्ववेत्त्याच्या सिद्धान्तावर आधारित आहे. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटचे प्रमुख व राज्यशास्त्रज्ञ डेनिसन फ्रांक थॉमसन (१९४०--) यांनी सुव्यस्थित मांडणी केली. जॉन रॉल्स या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्यापेक्षा अधिक जोमदार राजकीय विचार मांडणारे म्हणून ते जगभर ओळखले जातात. त्यांच्या 'पोलिटिकल एथिक्स' या प्रदीर्घ निबंधात त्यांनी ही मांडणी केली आहे. 
         राजकीय कृतींबद्दल नैतिक निर्णय घेण्याचे; या कृतींबद्दल नतिक सिद्धान्त मांडण्याचे बौद्धिक कौशल्य मिळविणे आणि त्या कौशल्याचा, विविध तात्त्विक दृष्टिकोनातून अभ्यास करणे म्हणजे राजकीय नीतिशास्त्र रचणे होय. या नीतिशास्त्रास राजकीय नैतिकता किंवा लोकनीतिशास्त्र असेही नाव आहे. तथापि 'राजकीय नीतिशास्त्र' हे नाव नुकतेच मिळू पाहत आहे. या विद्याशाखेचा उदय हा उपयोजित नीतिशास्त्राच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ही ज्ञानशाखा अगदी ताजी, नवजात असल्याने त्यावर खूप लेखन झाले आहे, असे नाही. पण जे काही लिहिले गेले आहे ते चिंतन-लेखन आजच्या घडीला अत्यंत उचित, संयुक्त, उपयुक्त आणि तसे पाहता उदंड मानता येईल, इतके आहे. हे लेखन विविध दृष्टिकोनांतून समस्यांची चर्चा करते. समस्यांच्या स्वरूपानुसार वेगवेगळे लेखन झाले आहे. ते परस्परांना छेद देते आणि त्याचवेळेस परस्परपूरकही ठरते. परिणामी या संपूर्ण वेगळ्या, वैशिष्टय़पूर्ण विविध समस्या आणि वेगवेगळे आनुषंगिक छेदक व पूरक साहित्य लक्षात घेता या नीतिशास्त्राचे दोन ठळक विभाग करण्यात येतात. 
          पहिले आहे प्रक्रियेचे नीतिशास्त्र आणि दुसरे आहे धोरणाचे नीतिशास्त्र. पहिले शासनाची विविध काय्रे, कर्तव्ये यासंबंधी आहे. ते लोकसेवक, नोकरवर्ग आणि त्यांची कार्यपद्धती, त्या कार्यपद्धतींची उपयुक्तता यावर लक्ष केंद्रित करते. दुसरे सार्वजनिक धोरणे आणि नीती यांचा अभ्यास करते. ते धोरणे आणि कायदे यावर लक्ष केंद्रित करते. या दोन्ही विभागांचे मूळ (१) नतिक आणि राजकीय तत्त्वज्ञान, (२)लोकशाही सिद्धान्त आणि (३) राज्यशास्त्र यावर बेतलेले आहे. पण राजकीय नीतिशास्त्र या तिन्हीपेक्षा वेगळी स्वतंत्र भूमिका मांडते. 
            राज्यकारभार चालविताना आणि सत्तेचे राजकारण करताना राजकीय नेते व प्रतिनिधी काही संकल्पना आणि तत्त्वे विचारात घेत असतात. त्यावर विसंबून ते आपला निर्णय घेतात आणि मग धोरणे निश्चित करतात. या संकल्पना कोणत्या आणि तत्त्वे कोणती आहेत, त्यांचे स्वरूप काय, त्यांचा प्रभाव कसा, कुठे परिणामकारक ठरतो किंवा ठरू शकतो, यांचा विचार करणे, ही राजकीय नीतिशास्त्राची भूमिका आहे. हे काम करताना म्हणजे या विषयाची मांडणी करताना संबंधित तत्त्वचिंतक पारंपरिक आदर्शवादी नतिक सिद्धान्ताचे उपयोजन करीत नाहीत तर वास्तवात राजकारणी, राजकीय नेते आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणारे लोक (किचन कॅबिनेट, अपना आदमी, विविध प्रकारच्या लॉबी, सल्लागार, सरकारी सचिव, खासगी सचिव आणि काही वेळेस चमचे मंडळी) कोणत्या तत्त्वांचा आधार घेतात, त्यांचा अभ्यास करतात. 
        'प्रक्रियेचे नीतिशास्त्र' कशाचा अभ्यास करते? तर इतर वेळेस चूक व अनैतिक ठरू शकणारे निर्णय घेण्याची परवानगी राजकारण्यांना कोणत्या मर्यादेपर्यंत दिली पाहिजे? दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करणे, युद्ध घोषणा करणे इत्यादी. या प्रक्रियेत निष्पाप नागरिकांचा बळी जातो, हे माहीत असूनही राजकारणी या कृती करतात, तेव्हा त्यांची नैतिकता कशी मोजावी? व्यापक देशहितासाठी नागरिकांशी खोटे बोलणे, त्यांच्यावरच नजर ठेवणे, चुकीची माहिती पसरविणे, बळाचा गरजेपेक्षा जास्त वापर करणे, गुप्तता पाळणे, प्रसंगी आणीबाणी आणणे, कधी कधी देशाच्या विरोधात प्रचार करणे (इंदिरा काळातील 'परकीय हात' प्रचार आठवा). या सामान्य जीवनात अनतिक मानल्या जाणाऱ्या कृती राजकीय जीवनात नतिक कशा ठरतात? या प्रकारचे प्रश्न प्रक्रियेचे नीतिशास्त्र उपस्थित करते. 
       धोरणाचे राजकीय नीतिशास्त्र कोणते निर्णय नैतिकदृष्टय़ा योग्य आहेत, हे विचारण्यापेक्षा कोणते निष्कर्ष स्वीकारणे धोरणात्मकदृष्टय़ा आवश्यक आहे आणि नागरिकांची इच्छा नसली तरी त्यांच्या विरोधात जाऊन, प्रसंगी बलपूर्वक त्यांची अंमलबजावणी कायद्याने करणे गरजेचे आहे असे विचारते. सामाजिक न्यायासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. साधन-साध्य शुचिता असा संघर्ष येथे नसतो तर साध्यांची मूल्यात्मकता कशी निश्चित करता येते हा प्रश्न असतो. 
       राजकीय नीतिशास्त्र पाश्चात्त्य जगतात इतके महत्त्वाचे मानले आहे की अनेक देशांनी त्याचा खास अभ्यास अगदी सरकारी धोरण म्हणून सुरू केला आहे. उदाहरणार्थ, कॅनडात गेल्या ५० वर्षांत राजकीय स्पर्धा गळेकापू झाली. परिणामी शासकीय पातळीवरच नैतिक सुधारणांची मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी अनेक कायदे सर्वपक्षीयांनी अमलात आणले. नवे राजकीय नीतिशास्त्र अभ्यासक्रम सरकारी पातळीवर सक्तीचे करण्यात आले. राजकारणाची नतिक पातळी उंचावण्यासाठी पंतप्रधान पियरसन यांनी पुढाकार घेतला. नंतर १९९३ मध्ये पंतप्रधान ख्रिशन यांनी नैतिक  वर्तणुकीचा जमाखर्च ठेवण्यासाठी अधिकृतरीत्या 'नैतिक सल्लागार कार्यालय' (the Office of the Ethics Counsellor) स्थापन केले. तिच्या कक्षेत मंत्रिमंडळ, खासदार आणि सगळी नोकरशाही यांचा समावेश केला. २००४ मध्ये रीतसर नवे नीतिशास्त्र विधेयक अमलात आणले गेले. हा धडा घेऊन ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी अशी कार्यालये व अभ्यास विभाग खास निधी उभारून स्थापन केले आणि या प्रयत्नांना यश येत आहे, अशी नोंद मायकेल अ‍ॅटकिन्सन आणि गेराल्ड बिएरिलग यांनी 'पॉलिटिक्स, द पब्लिक अँड पोलिटिकल एथिक्स : अ वर्ल्ड्स अपार्ट' या त्यांच्या शोधनिबंधात केली आहे. 
         राजकीय नीतीच्या संकल्पनेच्या विकासाला एक वेगळे वळण पीटर ब्रैनर या अमेरिकन अभ्यासकाने 'नैतिक भाग्य' ही संकल्पना मांडून दिले. 'डेमोक्रेटिक अ‍ॅटॉनॉमी : पोलिटिकल एथिक्स अँड मॉरल लक' या निबंधात त्याने ही संकल्पना मांडली. त्याच्या मते, जास्तीत जास्त लोकांनी मतदानात भाग घेणे योग्य असते, हे खरे आहे. पण चांगला उमेदवार निवडून येणे हे नेहमी अनिश्चित असते. पण चांगले उमेदवार निवडून आणणे ही दैववादी बाब बनू द्यावयाची नसेल तर मतदाते म्हणून आपण स्वायत्त, विचारशील माणूस आहोत याचे भान ठेवणे आणि जबाबदार प्रतिनिधी निवडणे हे काम आपण केले पाहिजे; तरच नागरिकांचे भाग्य नियतीवादी, दैववादी न बनता त्यांना निश्चित 'नैतिक भाग्य' बनेल, हे भाग्य आपण खेचून आणले आहे, असे त्यांना वाटेल. नैतिक भाग्य व्यक्तीला आपला स्वायत्त 'आत्म' ओळखण्यास शिकविते, योग्य प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी शिकविते आणि आपले भाग्य, जीवन आपल्याच हाती असते, याची जाणीव करून देते. जबाबदारीने केलेले, कोणत्याही मोहाला बळी न पडणारे मतदान हे व्यक्ती व समाज यांचे 'नैतिक भाग्योदया'चे द्वार आहे, हे शिकविते. 
       जाता जाता : राजकीय नीतिशास्त्रास असलेला इस्लामी आयाम स्पष्ट करणारे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे 'इस्लामिक पोलिटिकल एथिक्स : सिव्हिल सोसायटी, प्लुरलिझम अँड कॉन्फ्लिक्ट' (संपादक सोहेल हाश्मी, प्रिन्सेटन युनिव्हर्सटिी प्रेस, २००२). जागतिक शांततेत इस्लाम लोकशाहीच्या मार्गाने आपले योगदान देऊ शकतो, असे संपादक हाश्मी लक्षात आणून देतात.