Wednesday 24 December 2014

तत्त्वभान ५० भान न सोडता २५ डिसेंबर २०१४

                        भान न सोडता 
philosophy links relation between man and world
इमॅन्युएल कांट (१७२४-१८०४)
श्रीनिवास हेमाडे 

दैनिकाच्या पानांवर तत्त्वज्ञान या विषयावरील सदराचे प्रयोजन काय, येथपासूनचे अनेक प्रश्न 'तत्त्वभान' बद्दल गेल्या वर्षभरात काहीजणांनी उपस्थित केले. मागे वळून पाहिल्यास त्यांची उत्तरे मिळतात..

जगातील वाईटपणा, दुरिते टिकून राहण्यासाठी, ती यशस्वी होण्यासाठी आणि ही सर्व प्रकारची दुरिते अधिक समृद्ध व्हावीत ; यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते. ती म्हणजे चांगल्या माणसांनी काहीच करावयाचे नसते!
           माणूस आणि जग यांच्या नात्याचा शोध घेणारा अतिप्राचीन प्रयत्न म्हणजे 'तत्त्वज्ञान' या विषयाचा परिचय करून देणे, हा 'तत्त्वभान' या सदरामागील उद्देश होता. येथे 'परिचय' हा शब्द केवळ त्या शब्दाचा अतिपरिचय असल्यामुळे उपयोगात आणत आहे एवढेच. या सदरात जे काही अपेक्षित होते त्यासाठी वस्तुत: 'पूर्वपीठिका' (prolegomena) ही संज्ञा अधिक योग्य वाटते. तत्त्वज्ञानाबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आणि जिज्ञासा या अभिवृत्ती व्यक्त करण्यासाठी जे काही करावयाचे आहे, त्या साऱ्या प्रयत्नांना 'तत्त्वज्ञानाची पूर्वपीठिका' म्हणता येईल. 
     तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबाबत परिचय (introduction) व पूर्वपीठिका (prolegomena) या दोन संकल्पनांमध्ये फरक करता येईल. 'इंट्रोडक्शन' या संकल्पनेत अनंत विद्वतजड पंडिती गोष्टींची अपेक्षा असते. ज्यांना परिचय करून दिला जातो त्या वाचकांना-प्रेक्षकांना काहीएक पूर्वज्ञान आहे, असे गृहीत धरलेले असते. त्या गृहीतावर आधारित प्रदीर्घ युक्तिवाद मांडणे आणि निष्कर्षांप्रत येणे असे परिचय देताना घडते. 'प्रोलेगोमिना' या संकल्पनेत अशा तांत्रिकदृष्टय़ा किचकट गोष्टींची गरज नसते. पूर्वपीठिका ज्ञानासाठी उत्सुक असलेल्या सामान्यजनांसाठी असते. शब्दबंबाळ, बोजडपण टाळून सामान्य भाषेत ती मांडलेली असते. त्याच वेळी पुढील चच्रेची पूर्वतयारी म्हणून परिभाषेची, वादविवादाच्या उपकरणांची, काही मूलभूत सिद्धांताची ओळख पूर्वपीठिकेत करून दिली जाते. 
        आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांटने (१७२४-१८०४) आपले प्रगल्भ तत्त्वज्ञान 'शुद्ध बुद्धीची मीमांसा' (क्रिटिक ऑफ प्युअर रीझन) या ग्रंथात प्रामुख्याने मांडले पण त्याला सुशिक्षित वर्गाकडून व तत्त्ववेत्त्यांकडूनही प्रतिसाद मिळेना. अखेर त्याने सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या रीतीने साध्या भाषेत 'प्रोलेगोमिना टू एनी फ्यूचर मेटाफिजिक्स' हा ग्रंथ लिहिला. कांटने वापरलेला 'प्रोलेगोमिना' हा शब्द मी त्याच अर्थाने येथे वापरात आणत आहे. 
       विसाव्या शतकातील प्रसिद्ध तत्त्ववेत्ते हान्स रायखेनबाख यांच्या भाषेत सांगावयाचे तर सहजबुद्धी जे शिकविते त्यापेक्षा अधिक शिकण्याची इच्छा होण्याइतपत वाचकाकडे सहजबुद्धी असेल तर या सदरातील प्रतिपादन समजण्यासाठी तेवढी तयारी पुरेशी आहे. वाचकांना तत्त्वज्ञान या विषयात रुची वाटावी, ती वाढावी तसेच विद्यमान जग, त्यातील वास्तवाचे विविध स्तर, त्यातील समस्या आणि त्यांची गुंतागुंत यांचे विश्लेषण करण्यासाठी कोणती तत्त्वज्ञानात्मक आयुधे वापरता येतील, इतपत माहिती त्यांना असावी, हा उद्देश या लेखनामागे आहे. त्याचप्रमाणे जे वाचक अधिक काही करू इच्छित आहेत, ते प्राप्त करण्यासाठी त्यांना काय करावे लागेल, त्याचे केवळ दिग्दर्शन केले आहे. त्या हेतूने नंतरच्या लेखांमध्ये विविध ग्रंथ, व्यक्ती, तत्त्ववेत्ते आणि त्यांच्या सिद्धांताचा गोषवारा देण्यावर भर दिला गेला. 
        केम्ब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न (१९५५- विद्यमान) यांच्या मते, तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध करून देणे म्हणजे तत्त्वज्ञानाचे अर्थहीन सुलभीकरण करणे नाही. तर लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे आणि त्यांना तसा विचार करण्यास उत्तेजन देणे, असा केला पाहिजे. त्यामुळे जगाचे स्पष्टीकरण कसे करावे, ही समस्या न बनता जगाचे जे काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे ते समजावून घेण्याची क्षमता विकसित होते. 
         हे सदर तत्त्वभान देण्याचे. ते भान पुढील प्रकारचे असू शकते. त्यात भर पडू शकते. 
१) एखाद्या विषयाकडे, समस्येकडे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहता येते का? तसे पाहणे म्हणजे नेमके काय करणे? त्या समस्येचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र विकसित करणे अपेक्षित आहे का? 
२) त्या समस्येचा, त्या विषयाचा व तत्त्वज्ञान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारपद्धतीचा नेमका कोणता संबंध आहे? असेल तर तो तत्त्ववेत्त्यांच्या, तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून कसा होऊ शकेल? यासाठी तत्त्वज्ञानाची कोणती विचारपद्धती अवलंबता येईल? 
३) तत्त्वज्ञ, तत्त्ववेत्ते, व्यावसायिक तत्त्ववेत्ते (तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक) सर्व विषयांत पारंगत असतील असे नाही. ते ज्यात पारंगत असतात, त्याबद्दलचे भान या निमित्ताने विकसित करणे आणि त्यांच्या पारंगततेचा उपयोग करून घेऊन इतरांनी एकूण ज्ञानरचनेचा विस्तार करावयाचा असतो. 
       या सदरात भान किंवा ज्ञानात्मक जाणिवेचे स्वरूप, तत्त्व म्हणजे काय, तत्त्वज्ञानाच्या परिचयाचे मार्ग, पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा भारतातील आणि महाराष्ट्रातील प्रवेश, तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील खंडन-मंडन, सॉक्रेटिसचा संवाद, द्वंद्वविकास, विश्लेषण या चच्रेच्या पद्धती तसेच वैज्ञानिक पद्धती आणि सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या तत्त्वज्ञानाच्या पाच शाखा; अशा किमान साधनसामग्रीची ओळख; ही पूर्वपीठिका निर्माण होण्यासाठी करून देण्यात आली. तत्त्वज्ञानाचा इतिहास का अभ्यासावा, तत्त्वज्ञानाचा देशाच्या चारित्र्याशी कोणता ताíकक व नतिक संबंध आहे याचाही थोडक्यात आढावा दिला. 
       या लेखमालेत अनेक विषय राहून गेले. धर्माचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे नीतिशास्त्र, उपयोजित तत्त्वज्ञान (आणि त्यातील अनेक विषय), राजकीय- सामाजिक- कायद्याचे, इतिहासाचे-कलेचे- शिक्षणाचे तत्त्वज्ञान; त्याचप्रमाणे भारतीय दर्शनांची ओळख, दर्शनांना आलेली कुंठितावस्था, त्यांची विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील चिकित्सा अशा अनेक विषयांना न्याय देता आला नाही.
     तत्त्वज्ञानाच्या पाच शाखांपकी ज्ञानशास्त्र व नीतिशास्त्रावर अधिक भर दिला. विशेषत: सप्टेंबरपासून उपयोजित नीतिशास्त्रातील व्यवसाय, उद्योगसमूह, माध्यमे, जागल्या, राजकीय, पर्यावरण इत्यादी नीतिशास्त्रे काहीशी विस्ताराने मांडली. 
      तत्त्वज्ञानाचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत झाले तर आणि तरच त्याला नतिक मूल्य लाभते, या विश्वासातून हे लेखन झाले. उदाहरणार्थ, शेती, भारतीय शेती या विषयाचा तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची वेळ तर आली आहेच. पण पुढे जाऊन भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र रचले गेले तर शेतीविषयक धोरण निश्चित करता येईल, हे सुचविले आहे. म्हणूनच या विषयाला सर्वाधिक तीन लेख वाहिले. 
       तत्त्वज्ञान केवळ विद्यापीठीय, महाविद्यालयीन उच्च पातळीवरच अभ्यासले गेले पाहिजे, हा आग्रह पूर्ण सोडून दिला पाहिजे. पाश्चात्त्य-युरोपीय राष्ट्रांमध्ये तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. विविध प्रकारच्या संशोधनाला उत्तेजन देऊन संशोधनाचा उपयोग केला जातो. त्यामुळेच तेथे शेतीचे नीतिशास्त्र विकसित झाले. भारतीय समाजात विविध कारणांनी, तत्त्वज्ञान या विषयाला सरकार, धोरणकत्रे शिक्षणसंस्थाचालक, प्राचार्य यांच्या पातळीवर काहीही महत्त्व उरलेले नाही. आजची स्थिती तर फारच वाईट आहे. (त्यावर स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल) त्यामुळे तत्त्वज्ञानात रुची असणाऱ्यांनी एकत्र येऊन ही परंपरा पुढे नेली पाहिजे. 
      या सदराचा हेतू वाचकांमध्ये तात्त्विक विचार करण्याची तयारी केली पाहिजे, याचे केवळ भान आणणे आणि त्यानुसार कृती करणे, हा होता व आहे. शहाणपण शिकविणे हा हेतू नसून शहाण्या माणसांमधील शहाणपणाला हाळी देणे हा आहे. इथे तत्त्वभान हे सदर 'समाप्त' असे लिहिले तरी तत्त्वचिंतन कधी समाप्त होत नसते, ती अखंड वैचारिक आणि निखळ व्यावहारिक प्रक्रिया आहे. मेरी वॉरनॉक (१९२४-विद्यमान ) या ब्रिटिश विदुषीच्या मते, तत्त्वज्ञान हा एक अतिशय उच्च दर्जाचा सर्वसामान्य तऱ्हेचा शोध आहे आणि असा खेळ आहे की यात कुणीही, अगणित माणसे भाग घेऊ शकतात! 


Thursday 18 December 2014

तत्त्वभान ४९ कामसंबंधाचे नीतिशास्त्र १९ डिसेंबर २०१४


Work ethic

कामसंबंधाचे नीतिशास्त्र 

श्रीनिवास हेमाडे 
मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पैलूंचे परीक्षण नैतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र.
              उपयोजित नीतिशास्त्र ज्या अनेक  नैतिक समस्यांच्या प्रांतांची चिकित्सा करते आणि उपाय सुचवू पाहते त्या सर्व प्रांतांतील अतिप्राचीन प्रांत म्हणजे मानवी कामसंबंधाची रचना. विवाह व कुटुंबसंस्थेमुळे मानवी कामसंबंधाचे स्वरूप जितके सरळ दिसते, तितके वास्तवात सरळ नाही.  नैतिकतेचा प्रश्न जिथे अतिशय उग्र, वादग्रस्त, तापट आणि सर्वाधिक संवेदनशील बनतो ते हे क्षेत्र आहे. नैतिक म्हणजे विवाहसंमत संबंध आणि अनैतिक म्हणजे विवाहबाहय़ संबंध (विबासं) असा ढोबळ, पण कडक निकष असणारा हा लोकमान्य लोकप्रिय प्रांत आहे. ('विबासं' या नावाची अरुण म्हात्रेची अंतर्मुख करणारी कविता आहे.) 'इतर मानवी व्यवहारांत अनैतिकता असते, त्याचाही गंभीर विचार केला पाहिजे', असा विचारच माणसाला सुचू देत नाही, इतका या प्रांतातील  नैतिक निकषाचा विचार भयानक मजबूत, शक्तिशाली आणि मेंदू बंद करणारा असतो.
              एखादी व्यक्ती कितीही लबाड, गुन्हेगारी वृत्तीची असली, पण विबासं कृती करीत नसेल, तर ती  नैतिक व्यक्ती आणि एखादी व्यक्ती सचोटीची, प्रामाणिक, कर्तव्यकठोर असली, पण विबासं कृती करीत असेल, तर ती अनैतिक, ढोंगी मानली जाते. शिक्षण, उच्च प्रशिक्षण, समजूतदारपणा, अभिवृत्ती, शहाणपणा, प्रज्ञान इत्यादी काहीही नसलेल्या सामान्य माणसालाही ही बांधेसूद अनैतिकता समजते.
            दोन व्यक्तींमधील कामसंबंध एका सूत्रबद्ध व्यवस्थेत बांधून टाकण्यासाठी लग्न आणि कुटुंबसंस्थेची रचना झाली. त्याचवेळी विबासंकृत अनैतिकतेचा उगम झाला; पण मुळात कुटुंबसंस्थेतून सर्व संस्कृतींतील वर्ण, जात-जमाती आणि लिंगभेदाच्या शोषणाचा पाया रचला गेला. Family आणि 'कुटुंब' या संस्कृत-मराठी शब्दाचा मूळ अर्थ घरगुती गुलाम, वेठबिगार. (कुटुंबव्यवस्थेत थोडेफार काही चांगले असते, तर सुटुंबव्यवस्था म्हटले असते! ) 
          ब्रह्मचर्य, हस्तमथुन, विवाह, प्रजनन, गर्भनिरोधन, कपटप्रणयचेष्टा (flirting), लैंगिक स्वैराचार, जारकर्म, तात्पुरते कामसंबंध, लैंगिक छळ, पाशवी वर्तन, विनंती संभोग, भावनिक ब्लॅकमेिलग, विनयभंग, बलात्कार तसेच वेश्यागमन, समिलगी संबंध, जबरी संबंध, लिव्ह इन रिलेशन, अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट- निकटच्या निषिद्ध नात्यांमधील विवाह किंवा इतर लैंगिक संबंध), लैंगिक अपमार्गण (पॅराफिलिआ), अश्लील साहित्यांचा उपभोग आणि विविध लैंगिक विकृती व आजार या व अशा इतर अनेक संकल्पनांचा अचूक शोध घेणे, त्यांचे नेमके अर्थ निश्चित करणारी उपयोजित तत्त्वज्ञानाची शाखा म्हणजे लैंगिकतेचे तत्त्वज्ञान (the philosophy of sexuality) ही नवी विद्याशाखा. संकल्पनांचे अर्थ निश्चित झाले की, त्यांचा अभ्यासाचा, चिंतनाचा आणि मानवी आरोग्य व जीवन सुधारण्याचा मार्ग खुला होतो. हे महत्त्वाचे कार्य लैंगिकतेचे तत्त्वज्ञान करते. 
              लैंगिकतेच्या तत्त्वज्ञानाची दोन गृहीत तत्त्वे आहेत. एक- कामानंद व कामसमाधान मिळवून देणाऱ्या मानवी कृती आणि इच्छा शोधणे. दोन- या मानवी कृती आणि इच्छा केवळ कामानंद व कामसमाधान देणाऱ्या नसून नवी माणसे जगात आणणे, म्हणजे मानवजात टिकविणे याच्याशी निगडित आहेत, हे लक्षात आणून देणे. लैंगिकतेचे तत्त्वज्ञान वरील संकल्पनांचा व आनुषंगिक मुद्दय़ांचा सांकल्पनिक आणि आदर्शवादी असा दोन प्रकारचा शोध घेते. 
          सांकल्पनिक शोध म्हणजे कामेच्छा आणि कामकृती या मूलभूत कल्पना स्पष्ट करणे; त्यांच्या व्याख्या, मर्यादा, त्यातील भावी संशोधन यांचे विश्लेषण करणे. जसे की, एखादी इच्छा कामेच्छेत रूपांतरित होते म्हणजे नेमके काय घडते किंवा फसवून कामोपभोग घेणे आणि अहिंसक बलात्कार या संकल्पना व त्याप्रमाणे होणारी कृती यात नेमका फरक काय आहे? यांचे विश्लेषण करणे. (उदाहरणार्थ बटरड्र रसेलचे लग्नाबद्दलचे मत.) 
           आदर्शवादी शोध म्हणजे कामेच्छा, कामकृती व कामसमाधान यांच्या  नैतिक मूल्यमापनाची कसोटी रचणे. या कसोटय़ा शोधणे, रचणे, त्यांच्या समर्थनाचे युक्तिवाद रचणे हे मोठय़ा जिकिरीचे, अवघड आणि नाजूक काम असते. थोडक्यात, लैंगिकतेचे तत्त्वज्ञान दोन हेतू सांगते. पहिला- मानवी जीवन गुणवान, शुभ पातळीला नेण्यात मानवी लैंगिकता कोणते योगदान देते आणि कामकृती करताना कोणती  नैतिक बंधने पाळणे आवश्यक व अनिवार्य आहे, याची मांडणी करणे. दुसरा- आपली कामकृती व आपले कामसमाधान साधताना समाजातील इतरांशी संवाद कसा करावा, त्याकरिता कोणती  नैतिक जबाबदारी पार पाडावी याची मांडणी करणे. 
           या दोन्ही हेतूंमधून कामसंबंधाचे नीतिशास्त्र निष्पन्न होते. मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पलूंचे परीक्षण  नैतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र. (सेक्सुअल एथिक्स, सेक्स एथिक्स किंवा सेक्सुअल मॉरॅलिटी). विवाहपूर्व, विवाहोत्तर, विवाहित स्थितीतील लैंगिक संबंधातून लिंगभेद आणि सत्तास्पर्धा कशी व्यक्त होते, त्याचा वेध हे नीतिशास्त्र घेते. व्यक्तिगत आणि व्यापक सामाजिक आरोग्यावर लिंगभेद आणि सत्तास्पर्धा कशी परिणाम करते, याचाही शोध यात घेतला जातो. 
         कामसंबंधाच्या नीतिशास्त्राच्या मुख्य तीन भूमिका मानल्या जातात. (१)  नैतिक शून्यवाद (मुळात चांगले आणि वाईट असे काहीच नसते, सारे निर्थकच असते.) (२)  नैतिक सापेक्षतावाद ( नैतिकता व्यक्ती, परिस्थिती, संस्कृती देशकालसापेक्ष असते. त्यातून सार्वत्रिक नियम बनविता येत नाहीत.) (३) नैतिक सार्वत्रिकवाद (नतिकता सार्वत्रिक असते आणि ती सक्तीची असते.) याशिवाय सुखवाद, उपयुक्ततावाद, कर्तव्यवाद, व्यक्तिवाद, उदारमतवाद (परस्पर सहमतीने होणारा कामसंबंध  नैतिकदृष्टय़ा समर्थनीय मानणे), आधुनिकतावाद (परस्पर सहमतीने, कृतीची पूर्ण जाणीव असणारा, बांधीलकी मानणारा आणि प्रेमभावनेने युक्त असणारा कामसंबंध  नैतिकदृष्टय़ा समर्थनीय मानणे) हे आणखी नैतिक  सिद्धान्त आहेत. चंगळवाद, व्यापारीकरण, व्यावसायिकीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी नव्या आर्थिक बाजूंमुळे लैंगिक वर्तन गुंतागुंतीचे बनले आहे. लैंगिक सुख ही विक्री वस्तू बनविली गेल्याने व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्य हा प्रश्न अधिक उग्र बनला आहे. विवाह व कुटुंबसंस्थेच्या रचनेवर धर्मसंस्थेच्या वर्चस्वाने विधायक आणि विघातक (देवदासी) परिणाम केले आहेत. या सर्व आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, जैविक, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय बाजूंचा अभ्यास कामसंबंधाच्या नीतिशास्त्रात होतो.
           हे सारे पैलू लक्षात घेता कामनीतीविषयक पारंपरिक आणि विविध आधुनिक युक्तिवादांचा समाजातील विविध सामाजिक संस्थांवर आणि मानवी वर्तनावर काहीएक परिणाम होतो. त्यामुळे या युक्तिवादांचे गुणधर्म आणि त्यांच्या त्रुटी यांचे मूल्यमापन, कामनीतीविषयक विविध पातळ्यांवर होणारी चर्चा आणि समकालीन लैंगिक वर्तनाचे प्रकार यांचे विश्लेषण, त्यासाठी विविध  नैतिक संकल्पना आणि सिद्धान्त यांचे उपयोजन ही कामसंबंधाच्या नीतिशास्त्राची उद्दिष्टे बनतात. स्त्रीवादाने या नीतीचे यातील पुरुषी वर्चस्व नाकारले आणि नव्या नीतीची मागणी केली. 
          भारतात कामनीतीचा एकात्म, बांधेसूद विचार आहे. त्यातून व्यापक सर्व समाजाला, जातीजमातींत लागू पडेल, अशी ज्ञानाची खुली परिस्थिती नाही. काम एकीकडे विश्वाचे आदिबीज आणि माणसाचा पुरुषार्थ बनला. दुसरीकडे षड्रिपूंमध्ये काम हा मुख्य शत्रू आहे! कामविषयक (आणि एकूण) सर्व ज्ञानाचे साहित्य अतिशय अवघड रचनेत, किचकट रीतीने, लोकभाषा प्राकृतऐवजी संस्कृतात लिहिले गेले. कामशास्त्र, तंत्रशास्त्र गुप्त ठेवल्याने त्यात नवीन सुधारणा, नवा तपास, संशोधन, प्रगती शून्य झाली. सगळे तत्त्वज्ञान, साहित्य इत्यादी वर्ण, जात आणिलिंगभेद यांनी ग्रस्त झाल्याने सर्वसामान्य लोकांत म्हणजे सर्व जातीजमातींत कोणत्याही ज्ञानाचा योग्य, यथार्थ प्रसार-प्रचार झाला नाही. आचरणात नीट काही उतरले नाही. त्यात कामशास्त्रही आहे. कामशास्त्र हा चांगल्या, समृद्ध जीवनाचा आराखडा देणारा ग्रंथ आहे, हे वाचल्याशिवाय कसे कळणार?

Wednesday 10 December 2014

तत्त्वभान ४८ वैद्यकीय नीतिशास्त्र ११ डिसेंबर २०१४

medical ethics

वैद्यकीय नीतिशास्त्र
 श्रीनिवास हेमाडे
भारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते. शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली.

''औषधे घेणे टाळण्याचे प्रशिक्षण लोकांना देणे हे डॉक्टरचे आद्य कर्तव्य आहे''

           माणूस आणि विविध प्रकारच्या अतिसूक्ष्म ते महाकाय पशुपक्ष्यांचा नैतिक मूल्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणारी उपयोजित नीतिशास्त्राची शाखा म्हणजे जीवनीतिशास्त्र (बायोएथिक्स). मानवेतर पशुपक्षी हे माणसाचे केवळ सहनिवासी नाहीत तर नातेवाईक आहेत, असे जीवनीतिशास्त्र गृहीत धरते. त्यावर आधारित ''जगातील कोणत्याही मानवेतर सजीवाशी माणसाचे कोणते आणि कशा स्वरूपाचे नैतिक  नाते असावे'' याचा धोरणात्मक नैतिक निर्णय घेते. पृथ्वीवर जीवन कसे सुरू झाले, जीवनाचा अंत कसा होतो, शेतीविषयक संशोधन आणि वैद्यकीय संशोधनाची मूल्ये (वैज्ञानिक आणि नैतिक) कोणती? यांचा अभ्यास हे जीवनीतिशास्त्राचे मुख्य विषय आहेत. जीवनीतिशास्त्रातून वैद्यकीय नीतिशास्त्राचा उगम होतो. 
        सार्वजनिक आरोग्यविषयक धोरण, जीवनाचा अंत करण्याची नीती, साथीचे रोग, सजीवांचे प्रजनन, मानवी सुप्रजनन (?), प्राण्यांवरील प्रयोग, वैद्यकीय प्रशिक्षणात रोग्यांवर प्रयोग करण्याचे नीतिशास्त्र (क्लिनिकल एथिक्स), क्लोिनग आणि स्टेमसेल, जीवतंत्रज्ञान हे (तसेच नीतिशास्त्र आणि विज्ञान हा व्यापक मुद्दा) हे जीवनीतिशास्त्र आणि वैद्यकीय नीतिशास्त्र यांचे समान विषय आहेत. 
         हे विषय केवळ माणसापुरते सीमित करण्यात आले तेव्हा मानवी वैद्यकीय नीतिशास्त्र (मेडिकल एथिक्स किंवा ह्य़ूमन मेडिकल एथिक्स) अस्तित्वात आले. त्याच वेळी प्राणिहक्क, प्राण्यांवरील प्रयोग, त्यांचे पृथ्वीवर अस्तित्वात असण्याचे महत्त्व, प्राण्यांचे नैतिक व सौंदर्यशास्त्रीय मूल्य (विशेषत: बालकांच्या भावजीवनातील पशुपक्ष्यांचे अविभाज्य स्थान!) इत्यादींचा विचार होऊन प्राणिवैद्यकीय नीतिशास्त्र (अ‍ॅनिमल मेडिकल एथिक्स) अस्तित्वात आले. 
        हिप्पोक्रेटिसची (इ.स.पू. ४६०-३७०) शपथ, फॉम्र्युला कोमिटिस अर्कित्रोरम (इ.स.पू. पाचवे शतक) ही आचारसंहिता, रोमन डॉक्टर गालेन (१३१-२०१), इस्लामी परंपरेत इश्क इब्न अल-रुहावी या अरबी वैद्याचा आदाब अल-तबीब हा ग्रंथ, मुहम्मद इब्न झकेरिया आर-राझी आणि ज्यू वैद्य-तत्त्ववेत्ता माईमोनिडेस (११३५-१२०४), थॉमस अक्विनास (१२२५-१२७४) असा वैद्यकीय नीतिविचार सर्व संस्कृतीत आढळतो. थॉमस पर्सव्हिल (१७४०-१८०४) या ब्रिटिश डॉक्टरने प्रथम 'मेडिकल एथिक्स' आणि मेडिकल ज्युरिसप्रूडन्स हे शब्द वापरले. 
         वैद्यक व्यवसाय करताना डॉक्टर आणि इतर पूरक सेवा देणाऱ्या प्रत्येक सहकारी घटक व्यक्ती व संस्था यांनी कोणती नतिक मूल्ये आणि नतिक निर्णय उपयोजनात आणावेत, त्याचे मार्गदर्शन करणाऱ्या तत्त्वांची सुव्यवस्था रचना करणे म्हणजे वैद्यक व्यवसायाचे नीतिशास्त्र. वैद्यकाचा इतिहास, धर्मशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान या साऱ्यांचा यात समावेश होतो.
      'वैद्यकनीतीची चार सूत्रे (चतु:सूत्री) नावाने ओळखली जाणारी चार मूलतत्त्वे' 'प्रिन्सिपल्स ऑफ बायोमेडिकल एथिक्स' या ग्रंथात टॉम ब्यूचॅम्प आणि जेम्स चिल्ड्रेस (दोघे विद्यमान) अमेरिकन तत्त्ववेत्त्यांनी दिली आहेत. (१) रुग्णाची स्वायत्तता (उपचार घेण्याचा अथवा नाकारण्याचा रुग्णाचा हक्क), (२) परोपकारभाव (डॉक्टरने केवळ रुग्णाचे हित पाहावे म्हणजेच आíथक लोभ टाळावा), (३) रुग्णाविषयी केवळ शुद्ध व निखळ हितचिंतकवृत्ती (रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत इजा न करणे) बाळगावी, (४) न्यायबुद्धी (औषधांचा तुटवडा असताना उपलब्ध औषधांचे योग्य वाटप करणे आणि उपचार करताना कोणास कसे किती प्राधान्य द्यावयाचे याचे तारतम्य बाळगणे, म्हणजे रुग्णाबाबत रास्तपणा आणि समता बाळगणे). त्याचप्रमाणे हिप्पोक्रेटिसची शपथ, डॉक्टर-रुग्ण संबंध (पितृत्ववाद- डॉक्टरने रुग्णाचा पिता असणे), डॉक्टर-डॉक्टर संबंध आणि डॉक्टर-समाज संबंध असे मुख्य तीन दृष्टिकोन; विश्वासार्हता आणि सचोटी (रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना उपचाराची माहिती देणे व त्यांची संमती मिळविणे), रुग्णाची व्यक्ती म्हणून असलेली प्रतिष्ठा, रुग्णाचे हक्क आणि रुग्णाची कर्तव्ये या समस्यांचा समावेश या नीतिशास्त्रात होतो. 
        विसाव्या शतकाच्या अखेरीस गर्भपात (स्त्रीवादी चळवळीने आणलेला वैद्यकीय नतिक मुद्दा), दयामरण, स्वेच्छामरण, अवयवरोपण, आत्महत्या हे मुद्दे, विकसनशील देशांच्या संदर्भात आरोग्यविषयक उत्पादनांच्या पेटंटची समस्या, औषध उत्पादक कंपन्यांचे राजकारण, वैद्यकीय संशोधनातील पुढील टप्पे (उदा. जनुक संस्करणाची नतिक व वैज्ञानिक स्थिती), तसेच या व्यवसायास आलेले नफेखोरीच्या धंद्याचे स्वरूप, ग्राहक संरक्षण कायदा हे वैद्यकीय नीतीचे नवे उग्र प्रश्न आहेत. 
            भारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते. सृष्टी व जीवन यांच्यासंबंधी एका सुसंगत व समग्र विचारसरणी आयुर्वेदात मांडली आहे. आयुर्वेद हे एकमेव खरे भारतीय विज्ञान आहे. चरक (इ.पू. ३००) सुश्रुत (चरकाचे समकालीन) आणि वाग्भट (सातवे शतक) या तिघांना वृद्धत्रयी, बृहद्त्रयी या नावांनी ओळखले जाते. शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली. 
            भारतात इंडियन मेडिकल कौन्सिलने आचारसंहिता दिली आहे खरी, पण अतिमहागडे वैद्यक शिक्षण, औषध कंपन्यांची जीवघेणी स्पर्धा, विविध पातळ्यांवरील कट-पॅ्रक्टिस ते मृतदेहावर उपचार करण्यापर्यंत अधमपण अनुभवास येते. आरोग्य विमा (मेडिक्लेम)ने तर नवे हितसंबंधी राजकारण व अर्थकारण निर्माण केले आहे. भारतीय आरोग्य सेवा कुटुंबचलित आणि उद्योग समूहचलित ही खासगी आणि सरकारी सेवा ही सार्वजनिक असून दोन्हीकडे व्यापक प्रमाणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लूटमार आहे. ग्रामीण-आदिवासी भागात आणखी वेगळे प्रश्न आहेत. फोरम फॉर मेडिकल एथिक्स सोसायटीचे दि इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स हे त्रमासिक १९९३ पासून सुरू झाले.
        प्राणी व्यावसायिक नीतिशास्त्र (व्हेटेरिनरी प्रोफेशनल एथिक्स) आणि प्राणी नीतिशास्त्र (अ‍ॅनिमल एथिक्स) यांनी मिळून प्राणिवैद्यक नीतिशास्त्र बनते. 'प्राण्यांचे आरोग्य' हा विषय अ‍ॅरिस्टॉटलपासून तत्त्ववेत्ते आणि वैद्यकजगतात चíचला जात आहे. माणसाने माणसाचे मानवी वैद्यक विज्ञान विकसित करणे, यात वेगळे वैशिष्टय़ नसून माणसाने प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे वैद्यक नीतिभान विकसित करणे यात आहे, असे म्हणता येईल.
          'वैद्यकाचे तत्त्वज्ञान' ही नवी ज्ञानशाखा एलिशा बार्टलेट (१८०४-१८५५) या डॉक्टर व कवी विचारवंतांच्या 'अ‍ॅसेज ऑन दि फिलॉसॉफी ऑफ मेडिकल सायन्स' या ग्रंथाने सुरू झाली. आधुनिक परिभाषेत लिहिले गेलेला हा जगातील अ‍ॅकेडेमिक स्वरूपाचा पहिला ग्रंथ मानला जातो. 'वैद्यकाचे तत्त्वज्ञान' हा विषय तत्त्वज्ञानात येतो की वैद्यकात, याबद्दल बराच खल होऊन ती आता आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा मानली जाते. 'डॉक्टर विचार कसा करतात?' (हाऊ डॉक्टर्स थिंक) या एकाच नावाचे दोन ग्रंथ गेल्या दशकात प्रकाशित झाले. वैद्यकीय मानव्यविद्या संशोधिका कॅथरिन मॉण्टगोमेरी (२००६) आणि डॉ. जेरोमी ग्रूपमन (२००७) यांनी ही पुस्तके लिहिली. 
       भारतात प्राणिनीतीचा विचार झाला आहे. पालकाप्य मुनीचा हस्त्यायुर्वेद आणि नारायण पंडिताचा मातंगलीला हे हत्तीसंबंधी मोठे वैद्यक ग्रंथ, बकरी, गाय इ. पशुचिकित्सेचा ग्रंथ म्हणजे १४ व्या शतकातील शारङ्गधर पद्धती. त्यातील 'उपवनविनोद' हा वृक्षवैद्यक विभाग आणि कुणी राघवभट्टाने लिहिलेल्या वृक्षायुर्वेद नामक ग्रंथाचा उल्लेख 'आयुर्वेद का इतिहास' या दुर्गादत्तशास्त्री लिखित पुस्तकात केला आहे, असे लक्ष्मणशास्त्री जोशी सांगतात.


Wednesday 3 December 2014

तत्त्वभान ४७ भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राकडे .. ०४ डिसेंबर २०१४


भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राकडे .... 

श्रीनिवास हेमाडे 
शेतीच्या नीतिशास्त्राचे पाश्चात्त्य प्रारूप भारतालाही लागू पडेल, असे नव्हे. महात्मा जोतिबा फुले, कॉ. शरद् पाटील, शरद जोशी ते वंदना शिवा आदींनी केलेल्या मांडणीआधारे पुढील पावले  उचलता येतील का?

इतर कोणत्याही गोष्टीची वाट पाहाता येते, पण शेतीविकासाची नाही.
         शेतीचे तत्त्वज्ञान, शेतीचे नीतिशास्त्र या दोन संकल्पना आणि शेती, शेतकरी, शेतीउत्पादने हा विषय पाश्चात्त्य-युरोपीय अ‍ॅकेडेमिक विचारविश्वाच्या आज अग्रस्थानी आहे. 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' आणि 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' हा विषय भारतीय अ‍ॅकेडेमिक विचारविश्वाच्या आणि शासकीय, प्रशासकीय निम्नसूचीतही कधीही आलेला नाही; पण आता तो अंमलबजावणीच्या पातळीवर अगदी ऐरणीवर अग्रस्थानी आणणे अत्यंत निकडीचे आहे. 
          या दोन्ही संकल्पनांचे देशी आणि समकालीन भारतीय प्रारूप बनविण्याकरिता काय करावे लागेल? उदाहरणार्थ, एक प्रारूप पाहू. ते असे : अमेरिकेतली नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सटिीच्या धर्म आणि तत्त्वज्ञान विभागाने नुकताच 'अन्नाचे तत्त्वज्ञान प्रकल्प' (द फिलॉसॉफी ऑफ फूड प्रोजेक्ट) सुरू केला आहे. तात्त्विक संशोधनाचा एक मूलभूत विषय म्हणून शेती आणि अन्न हा चर्चाविश्वात अग्रस्थानी आणणे, त्यातील नव्या तात्त्विक संशोधनाची माहिती राज्यकत्रे, धोरणकत्रे व सामान्य लोकांना देणे या विषयातील आंतरविद्याशाखीय संशोधकांना व इतर जिज्ञासू मंडळींना एकत्र आणणे हे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. शेतीचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र अशा मुख्य शाखा विकसित करून शेतीचे तत्त्वज्ञान ही नवी रचना ते निर्माण करीत आहेत. त्याचप्रमाणे अन्नाचे राज्यशास्त्र, अन्नतंत्रज्ञान आणि अन्नाशी जोडला गेलेला माणसाचा आत्मपरिचय व सामाजिक न्यायाचे वितरण (फूड आयडेंटिटी अँड जस्टिस) या विषयांचाही समावेश त्यांनी शेतीच्या तत्त्वज्ञानात केला आहे. त्यावर आधारित अभ्यासक्रम अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये, शाळा येथे शिकविले जातात. शेती, शेतीतील प्रत्येक कृती आणि शेतकऱ्यावर प्रेम (म्हणजे त्याचे अस्सल वास्तव कल्याण) हा शेतीच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा कायम ठेवून अनेक दृष्टिकोनांतून अभ्यास, संशोधन व लेखन यात होते आहे. या समग्र अभ्यासाची गंभीर दखल घेऊन सरकार, न्याय विभाग काटेकोर अंमलबजावणी करते.
          अर्थात हे प्रारूप आपणाला लागू पडेल किंवा तेच स्वीकारले पाहिजे, असे नाही. भारतीय शेतीचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र रचून आपण आपले देशी 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' विकसित करू शकू. काहीएक सुरुवात करणे आवश्यक आहे. 
            पाश्चात्त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानात शेतीधोरण शोधले तसे आपणही आपल्या तत्त्वज्ञानात काही बीज सापडते का ते पाहावयाचे, त्यात समकालीन कालसुसंगत भर टाकावयाची आणि त्यातून 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' विकसित करावयाचे. उदाहरणार्थ, कृषिसूक्त, भूमिसूक्त, अन्नसूक्त यांना आणि अन्नाचे रूप धारण करणारे देव आणि अन्नाची इच्छा व्यक्त करणाऱ्या शेकडो ऋचांना ज्येष्ठ विचारवंत स. रा. गाडगीळ अन्नब्रह्मवाद (फूड फिलॉसॉफी) म्हणतात. जमिनीचे व्यवस्थापन, निगराणी, महसूल आणि शेती व्यवसायाचा धोरणात्मक विचार बादशहा अकबर, त्याचे अधिकारी राजा तोडरमल आणि मुझफ्फर खान या अधिकाऱ्यांनी आणलेली मनसबदारी पद्धती, छत्रपती शिवरायांची 'आज्ञापत्रे', त्यानंतर म. जोतिराव फुल्यांच्या लेखनात आढळतो. इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च या भारतातील तत्त्वज्ञानाच्या शिखर संस्थेने बाराव्या शतकापर्यंतचा भारतीय शेतीचा इतिहास खंड रूपाने (सं. लल्लनजी गोपाल, व्ही. सी. श्रीवास्तव) प्रसिद्ध केला आहे. त्यात अनेक आधार मिळू शकतात.
           शेतीकडे अर्थव्यवस्थेचा कणा व जीवनाचे इहवादी तत्त्वज्ञान म्हणूनच पाहणे हे भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान या विषयाची तात्त्विक बाजू मानता येईल. नियती, नशीब, कर्मफळ, जातिव्यवस्था, स्त्रीशोषण यांचा पुरस्कार करणारे पारंपरिक जीवनविषयक तत्त्वज्ञान; त्यावर आधारित पुराणे, कथा, प्रवचने इत्यादी साहित्याचा त्याग करणे आणि नवे शेतीपूरक, शोषणरहित, समतापूर्ण सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे विचार परंपरेत शोधणे किंवा निर्माण करणे, जगातील ज्या तत्त्वज्ञानातून अशी तत्त्वे मिळतील तिथून ती आत्मसात करणे, त्यांचा समावेश करून या नव्या तत्त्वज्ञानाची रचना करणे ही भारतीय शेतीच्या तत्त्वज्ञानाची काही आधारभूत तत्त्वे मानता येतील.
            शेतीला प्राधान्य देणारे भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान रचले गेले की भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचता येईल. त्यासाठी भारतीय शेती व्यवसायाचा इतिहास, विद्यमान स्थिती आणि आधुनिक जागतिक नीतिव्यवस्था यांची सांगड घालणे आवश्यक आहे. भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राचा मुख्य विषय भारतीय समाजजीवनास चपखल लागू असणारी सार्वजनिक धोरणे निश्चित करणे हा आहे. पण भारतीय शेतीक्षेत्राचा इतिहास पाहिल्याशिवाय भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे फार कठीण आहे. भारताला विस्तीर्ण भूगोल आणि जडशीळ ओझं बनलेला प्रदीर्घ इतिहास आहे. तो शेती इतिहासाबरोबर वर्णजाती-जमाती व िलगभेदग्रस्त शोषणव्यवस्थेचाही इतिहास आहे. कॉ. शरद पाटील, देबिप्रसाद भट्टाचार्य, आ. ह. साळुंखे, वंदना शिवा यांच्यासारख्या अनेक तज्ज्ञांनी त्या इतिहासावर बोट ठेवले. भारतीय शेतीचे आधुनिक नीतितत्त्वज्ञ म्हणून म. जोतिराव फुले आणि कॉ. शरद पाटील आणि समकालीन शेतीनीतिशास्त्रज्ञ म्हणून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे नाव घेणे अनिवार्य आहे. 
        'आम्ही आपल्या स्थानिक गरजेवर आधारित शेतीनीतिशास्त्राची व्याख्या कशी करावी? ही आमची समस्या आहे', असा प्रश्न आधुनिक काळातील शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उपस्थित केला पाहिजे. आधुनिक विद्य्ोची जोड देऊन विद्यमान भारतीय समाजव्यवस्था आणि भारतीय मानसव्यवस्था लक्षात घेऊनच सार्वजनिक हिताची धोरणे शेतीनीतिशास्त्राच्या सूचीत निश्चित करता येतील. समाजसेवा (सोशल सव्‍‌र्हिस), व्यवसाय (प्रोफेशन), धंदा (बिझनेस), आवडीचा छंद (व्होकेशन), नफेखोरीचा धंदा (ट्रेड), उद्योगसमूह (कॉपरेरेशन/ कंपनी) यातील नेमके काय म्हणून शेतीकडे पाहावायचे हे धोरण ठरविणे हा भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राचा कळीचा प्रश्न मानता येईल.
             शेतीचे नीतिशास्त्र हा प्रकल्प राबविण्याकरिता पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी उपयोजनात आणलेली वैचारिक उपकरणे, साधने व पद्धती यांचा पुरेपूर उपयोग 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' रचताना होऊ शकतो. त्यांना भारतीय तत्त्वज्ञानातील आणि इतर विचारविश्वातील वैचारिक उपकरणे, साधने व पद्धती यांची जोड देता येईल. त्यास 'भारतीय शेतीचे तर्कशास्त्र' म्हणता येईल.
         या विद्याशाखा आकारल्यानंतरच त्यांचा समावेश शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर करता येईल.
            जगात सर्वत्र तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात शेती तत्त्वज्ञान व शेती नीतिशास्त्रविषयक व्यापक वैचारिक साहित्य निर्माण करण्याचे काम वेगात सुरू आहे. विशेषत: अमेरिकन विद्यापीठात अनेक पदव्या, अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. जगप्रसिद्ध भिख्खू बुद्धदास (१९०६-१९९३) यांची शेतीधम्म (अ‍ॅग्री धम्मा) ही संकल्पना लिंडसे फालयेव या विचारवंताने थाई भाषेतून इंग्रजीत आणली आहे. फूड पॉलिटिक्स (मेरीओन नेसले २०१३), फिलॉसॉफी ऑफ फूड (सं. डेविड काप्लान, २०१२), फूड अँड फिलॉसॉफी (फ्रित्झ ऑलहॉफ, डेव मनरो, २००७), कुकिंग, ईटिंग, िथकिंग : ट्रान्सफॉरमेटिव्ह फिलॉसॉफीज ऑफ फूड (डीएन कर्टीन, लिसा हेल्डेक, १९९२) ही पाश्चात्त्य ग्रंथांची वानगीदाखल काही नावे.
       भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ, अधिकारी वर्ग, शेतीतज्ज्ञ, शेतीशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, क्षेत्रीय अभ्यासक, शेतकरी संघटना, माध्यमे, बिगरसरकारी संस्था, रसायन, भूगोल, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र, अभियांत्रिकी या विषयांतील तज्ज्ञ, सीए इन्स्टिटय़ूट, तत्त्ववेत्ते व व्यावसायिक तत्त्ववेत्ते आणि आणखीही गरजेनुसार इतर तज्ज्ञ आणि कार्यकत्रे यांनी एकत्र येणे तातडीचे आहे.

Live Paper Link                 E-Paper Link